भोंगे उतरवल्याने हिंदू अधिक अडचणीत येईल- आनंद दवे
मुंबई |
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे आणि रस्त्यावरील नमाज पठणला विरोध करत येत्या ४ मे रोजीपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवण्याचं अल्टिमेटम दिलं आहे. मात्र, यावर आता हिंदू महासभेने प्रश्न उपस्थित केले आहे. जर मशिदींवरील भोंगे उतरवले तर हिंदू सणांचं काय करायचं, असा प्रश्न हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी उपस्थित केला. तसेच, याने हिंदूत्वाचं मोठं नुकसान होणार आहे, असंही ते म्हणाले.
“नमाज रस्त्यावर करायला हिंदू महासभेने पहिल्या दिवसापासून विरोध केला आहे, तो आजही आमचा विरोध आहे. परंतू, सरसकट रस्त्यावरच सर्व बंद केलं तर गणपतीत मांडवांमध्ये होणाऱ्या आरत्यांचं काय करायचं, नवरात्री दांडियाचं काय करायचं, दहीहंडीचं काय करायचं, हा प्रश्नही उपस्थित होईल. हिंदू अधिक अडचणीत येईल, असं हिंदू महासंघाचं म्हणणं आहे. बाळासाहेबांच्या काळातही भोंगे उतरवणं शक्य झालं नाही”, असं आनंद दवे म्हणाले.
- राज ठाकरेंचं सरकारला अल्टिमेटम
राज ठाकरे यांनी काल औरंगाबादेत भव्य सभा घेतली. यावेळी त्यांनी मशिदीवरील भोंगे उतरवलेच पाहिजे असा इशारा दिला. अन्यथा ४ मे रोजीपासून आम्ही ऐकणार नाही. ४ मे रोजीनंतर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लागू असं त्यांनी सांगितलं. तसेच, रस्त्यावरील नमाज पठणालाही त्यांनी विरोध केला.