मैत्रिणीला वाचवायला गेला, पण ‘तो’ही कालव्यात बुडाला
रत्नागिरी | शिरगाव चिपळूण तालुक्यातील अलोरे येथील चारजण कोलकेवाडी येथे पोहण्यासाठी गेले होते. मात्र, कालव्यातून येणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्याने हे चौघेही बुडाले. यावेळी, धनगर बांधवांनी दोघांना वाचवले, तर दोघे अद्याप बेपत्ता आहेत. यामध्ये अलोरे सोमेश्वर मंदिर येथील सुजय संजय गावठे आणि त्याची मैत्रीण ऐश्वर्या श्रीकांत खांडेकर ही बेपत्ता आहे. तर शाहीन कुट्टीनो, रुद्र जंगम यांना वाचवण्यात यश आले आहे.
कालव्याच्या पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना
बुधवारी (२७ एप्रिल) सायंकाळी ५ च्या सुमारास ही घटना घडली. बेपत्ता सुजय गावठे आणि ऐश्वर्या खांडेकरसोबत शाहीन कुट्टीनो, रुद्र जंगम हे सगळे महाविद्यालयीन मित्र- मैत्रिणी कोळकेवाडी टप्पा चार नजीक कालव्याच्या पाण्यात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेले होते. तिथे ही दुर्घटना घडली.
मैत्रिणीला बुडताना पाहून तिला वाचवायाला गेला तो परतलाच नाही
हे चौघेही पाण्यात पोहत असताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. तेव्हा त्यांनी आरडा-ओरड केली असता जवळच असलेल्या धनगर बांधवांनी धाव घेतली रुद्र आणि शाहीन यांना बाहेर काढले. ते सुजयलाही बाहेर काढणार होते, मात्र ऐश्वर्या बुडत असल्याचे बघून तो पाण्यात परत गेला. त्यानंतर हे दोघेही अद्याप बेपत्ता आहेत.
या घटनेटची माहिती मिळताच अलोरे पंचक्रोशीतील जिल्हा परीषद सदस्य विनोद झगडे, तुषार चव्हाण, प्रमोद महाजन, घनश्याम पालांडे, प्रकाश आंब्रे आणि अनेक युवा कार्यकर्त्यांनी कोळकेवाडी धरण परिसराकडे धाव घेतली. त्यानंतर बचाव कार्यला सुरुवात करण्यात आली.
चिपळूण तहसीलदार सूर्यवंशी आणि अलोरे शिरगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बेपत्ता असलेल्या दोघांना वाचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले. मात्र, काळोख झल्याने बचावकार्य थांबवण्यात साडे सातनंतर थांबवण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे अलोरे परिसरात शोकाकुल वातावरण आहे.