breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

ग्राऊंड रिपोर्ट : माजी आमदार विलास लांडेंचा स्वाभिमान दुखावला!

शिरुरमधून शिवाजीराव आढळराव पाटलांची उमेदवारी निश्चित : उमेदवारीसाठी तीव्र दावेदार लांडे समर्थकांमध्ये मोठी नाराजी

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
शिरुर लोकसभा मतदार संघातून अजित पवार यांचे समर्थक माजी आमदार विलास लांडे तीव्र इच्छुक होते. मात्र, तरीही शिवसेनेतील (शिंदे गट) आयात उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीच्या तिकीटावर उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामुळे या मतदार संघातून उमेदवारीसाठी आग्रही असलेले विलास लांडे आणि समर्थकांचा स्वाभिमान दुखावला आहे. विशेष म्हणजे, आगामी विधानसभा निवडणुकीत लांडे वेगळा विचार करतील, असा दावा केला जात आहे.

पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचा बलाढ्य नेता अशी विलास लांडे यांची ओळख आहे. शरद पवार यांच्याशी निष्ठा आणि अजित पवारांचे समर्थक असा राजकीय समतोल त्यांनी साधला होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवार यांच्यासोबत व्यासपीठावर हजेरी लावली होती. तसेच, अजित पवार यांच्या दौऱ्यातही लांडे अग्रभागी पहायला मिळतात. नगरसेवक, महापौर ते आमदार असा राजकीय प्रवास केलेले लांडे शहरातील सर्वात अनुभवी आणि मुरब्बी नेते आहेत.

२००९ मध्ये विलास लांडे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात शिरुर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. त्यानंतर २०१४ मध्ये राष्ट्रवादीने देवदत्त निकम यांना उमेदवारी दिली होती. २०१९ मध्ये पुन्हा लांडे यांनी मतदार संघात दौरे-बैठका वाढवल्या होत्या. पण, अजित पवार यांनी डॉ. अमोल कोल्हे यांच्या गळ्यात उमेदवरीची माळ घातली. त्यानंतर विधान परिषद निवडणुकीच्या वेळीसुद्धा लांडे यांना माघार घेण्याची सूचना करण्यात आली. राजकीय पटलावर प्रचंड ताकद असतानाही लांडे यांनी अजित पवार यांचा ‘शब्द’ प्रमाण मानला आणि समजुतीने घेतले आहे.

दरम्यान, २०२४ च्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या माध्यमातून विलास लांडे यांनी आपण इच्छुक आहोत, असे जाहीरपणे सांगितले होते. तसेच, महायुती धर्माचे पालन करीत भोसरीचे आमदार आणि लांडे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी महेश लांडगे यांच्याशीही जुळवून घेण्याची तयारी दर्शवली होती. ‘‘महायुतीच्या माध्यमातून महेश लांडगे यांना उमेदवारी द्या… आम्ही एकजुटीने काम करू…’’ असा दावाही त्यांनी केला होता. असे असतानाही लांडे यांच्या उमेदवारीबाबत अजित पवार यांनी सकारात्मक विचार केला नाही.

याउलट, शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीतूनच विरोध होता. दिलीप मोहिते पाटील यांनी जाहीरपणे त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला विरोध केला. तसेच, राष्ट्रवादीचे मंत्री दिलीप वळसे-पाटील यांचाही आढळराव यांच्या प्रवेशाला अप्रत्यक्ष विरोध आहे. यामध्ये मोहिते-पाटील आणि वळसे-पाटील यांच्याशी समझोता करण्यात अजित पवार यशस्वी झाले. त्यामुळे मोहिते-पाटील यांनी तडजोड करुन पुढे जाण्याची तयारी दर्शवली आहे. पण, विलास लांडे यांना विश्वासात घेतल्याशिवाय आढळराव पाटील यांचा विजय सोपा होणार नाही, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

विलास लांडे अन्‌ समर्थक विरोधाचा फटका…

भोसरीसह खेड, जुन्नर आणि आंबेगाव परिसरात माजी आमदार विलास लांडे यांचा मोठा जनसंपर्क आहे. त्याला नाती-गोती आणि पै-पाहुण्याचा आधार आहे. २०१४ पासून १० वर्षे लांडे सत्तेत नाहीत. असे असतानाही अजित पवार यांच्याकडून लांडे यांना शिरुरच्या उमेदवारीबाबत ‘हातावर तुरी’ दिल्या आहेत. त्यामुळे लांडे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. भोसरी विधानसभा मतदार संघात लांडे यांचे किमान ४५ ते ५० मतदान हक्काचे आहे. याहून शिक्षण संस्था, औद्योगिक संस्थांमध्ये ३ हजाराहून अधिक कर्मचारी कामगार आहेत. त्यामुळे किमान ६० हजार मतांवर लांडे यांचा प्रभाव राहणार आहे. त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी मिळाली, तरी विलास लांडे आणि समर्थकांच्या विरोधाचा मोठा फटका महायुतीला बसणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button