मोठा दिलासा! तीन महिन्यांनंतर मृतांची संख्या हजाराच्या आत
मुंबई |
देशात थैमान घातलेल्या करोनाच्या लाटेला ओहोटी लागली आहे. देशात दररोज आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येत मोठी घट होत असून, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीप्रमाणे रविवारी देशात ४६ हजार नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात आणखी एक मोठा दिलासा म्हणजे करोनामुळे होत असल्येल्या मृतांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. करोनाची दुसरी लाटे शिगेवर पोहोचल्यानंतर देशात दररोज साडेतीन हजार ते साडेचार हजार या सरासरीने मृतांची नोंद झाली होती. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून मृतांचा आकडा वाढण्यास सुरूवात झाली होती. तीन महिन्यांनंतर मृतांच्या संख्येत घट होऊ लागली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशातील करोना रुग्णसंख्येची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत अर्थात रविवारी देशात ४६ हजार १४८ नवी करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ५८ हजार ५७८ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. दिलासादायक महत्त्वाची बाब म्हणजे देशात दररोज होत असलेल्या करोना रुग्णांच्या मृ्त्यूंचा आकडाही घटला आहे. देशात गेल्या २४ तासांत ९७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १३ एप्रिलनंतर देशात पहिल्यांदाच मृत्यांची संख्या १ हजारांच्या आत नोंदवली गेली आहे.
- राज्यात करोनाचे ९,९७४ नवे रुग्ण
राज्यात गेल्या २४ तासांत करोनाचे ९,९७४ नवे रुग्ण आढळले. दिवसभरात १४३ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या १ लाख २२ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. दिवसभरात रायगड ६७२, पुणे जिल्हा ५८७, पुणे शहर २८६, पिंपरी-चिंचवड ३८६, सातारा ९२९, कोल्हापूर १५२५, सांगली १२०५, सिंधुदुर्ग ५०८, रत्नागिरी ५८३ नवे रुग्ण आढळले. विदर्भ आणि मराठवाडय़ातील रुग्णसंख्येत घट झाली आहे.