‘आम्हाला देशातली तीन मंदिरं शांततापूर्ण प्रक्रियेतून मिळाली, तर..’; गोविंद देव गिरी महाराजांचं विधान चर्चेत
Govind Dev Giri Ji Maharaj | अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न निकाली निघाल्यानंतर आता ज्ञानवापी व कृष्ण जन्मभूमी इथल्या मंदिरांचा मुद्दा चर्चेत आला आहे. ज्ञानवापी परिसरातील एका तळघरात सध्या पूजाविधी करण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. यावर देशभरात मोठी चर्चा चालू असतानाच आता राम जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी महाराज यांनी केलेलं एक विधान चर्चेचा विषय ठरलं आहे.
गोविंद देव गिरी महाराज म्हणाले की, देशातील तीन मंदिरं मुक्त झाली तर आम्हाला इतर मंदिरांकडे पाहाण्याची इच्छाही नाही. कारण आम्हाला भविष्याकडे पाहायचं आहे. भूतकाळात जगायचं नाहीये. देशाचं भविष्य चांगलं असायला हवं. त्यामुळे जर ही तीन मंदिरं आम्हाला सामोपचारानं, प्रेमानं मिळाली, तर आम्ही मागच्या इतर सर्व गोष्टी विसरून जाऊ.
हेही वाचा – ‘१० फेब्रुवारीला बैठक आणि उपोषण सुरु’; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
#WATCH | Pune, Maharashtra: Treasurer of Sri Ram Janambhoomi Trust Govind Dev Giri Maharaj says "We do not even desire to look at the other temples if three temples are freed because we have to live in the future and not in the past. The country’s future should be good and if we… pic.twitter.com/D4d4fQgViz
— ANI (@ANI) February 5, 2024
गोविंद देव गिरी महाराज यांना इतर मशिदींसंदर्भात मुद्दे उपस्थित केले जात असल्याबाबत विचारणा केली असता. ते म्हणाले, त्या लोकांनाही आम्ही समजवून सांगू. सगळ्यांना एकाच भाषेत सांगण्याची आवश्यकता नसते. काही ठिकाणी समजूतदार लोक असतात, काही ठिकाणी नसतात. त्यामुळे त्या त्या ठिकाणी ज्या प्रकारची स्थिती आहे, त्यानुसार भूमिका घेऊन आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न करू. आम्ही कोणत्याही प्रकारे अशांतता निर्माण होऊ देणार नाही. आम्हाला राम मंदिराच्या मुद्द्यावर शांततापूर्ण पद्धतीने उपाय मिळाला. आम्हाला आशा आहे, की इतर मंदिरांच्या बाबतीतही शांततापूर्ण मार्गानेच उपाय मिळेल, असंही गोविंद देव गिरी महाराज म्हणाले.