पवना नदीला प्रदूषणाच्या विळख्यातुन मुक्त करा : नाना काटे
- उपाय योजना करण्याचे महापालिका प्रशासनाला आवाहन
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना नदीवरील थेरगाव येथील केजुदेवी बंधारा परिसरात नदीच्या पाण्यावर सोमवारी (दि.21) मोठ्या प्रमाणात पांढरा फेस आल्याचे दिसले. काही कंपन्या व उद्योगाचे रासायनिक सांडपाणीही प्रक्रिया न करता नदीपात्रात मिसळत आहे. शहरासाठी वरदायनी असणाऱ्या पवनामाई नदीची दुरवस्था झाली असून प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी उपाय योजना करण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी महापालिकेकडे प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.
याबाबत काटे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून पवना नदीत वारंवार फेसाळत आहे. महापालिका पर्यावरण विभाग दिखाव्यासाठी नाममात्र कारवाई करते. पालिकेने शहरातील नागरिकांना दूषित पाणीपुरवठा करण्याचे पाप माथी घेऊ नये. जुलै महिन्यात पवना नदी पात्रता असाच फेस आला होता. त्यावेळी काही लॉंड्री व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला होता. नदी प्रदूषणात व्यवसाय करणाऱ्या बरोबर पावसाच्या वाहते पाणी, जलपर्णी, माती, कचरा, राडारोडा घाण मिसळते आणि पाणी दुषित होते. नदीत वाहने धुणे, वेगवेगळी रसायन पाण्यात सोडणे, केमिकलने माखलेले कपडे, वस्तू पाण्यांत टाकणे, ड्रेनेजचे पाणी थेट नदीपात्रात सोडणे असे अनेक प्रकार वारंवार होताना दिसत आहेत.
शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी व मुळा नदीच्या प्रदूषणाचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. महापालिकेने पुढाकार घेत तिन्ही नद्यांना मोकळा श्वास घेण्यासाठी अपेक्षित उपाय योजना तातडीने कराव्यात.
– नाना काटे, माजी विरोधी पक्षनेते.