शेतकऱ्यांसाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येणे गरजेचे
नाशिक – राज्यात अवकाळी पावसामुळे ओल्या दुष्काळासारखी स्थिती आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची आमची मागणी आहे. राजकारण बाजूला ठेवून समाज म्हणून सर्वांनी शेतकऱ्यांसाठी एकत्र येण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी राज्यभर दौरे करुन याप्रश्नावर आवाज उठविण्यात येईल, असे शिवसेना नेते आ. आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी केली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका केली. समृध्दी महामार्गाचा गाजावाजा होत असला तरी त्याचे काम चांगले झालेले नाही. राज्याच्या विकासाच्या गप्पा मारल्या जात असतांना गावोगावी रस्तेच नाहीत. शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे. वातावरण बदला मुळे अतिवृष्टीसारखी संकटे उभे राहतात. अद्याप नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. त्यांची खदखद बाहेर येत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.