देवेंद्र फडणवीसांचा राऊत आणि पवारांना खोचक टोला, नाकावर टिच्चून सरकार स्थापन केलंय…
![Devendra Fadnavis' Raut and Pawar's khochak tola, the government has been formed on the nose...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/Fadanvis.png)
मुंबई ः फेब्रुवारी महिन्यापर्यंत शिंदे-फडणवीस सरकार पडेल, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज महामोर्चाच्या भाषणांदरम्यान केला. मात्र, याच सरकारच्या नाकावर टिच्चून आम्ही सरकार स्थापन केलं आहे, असा खोचका टोला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. जीएसटी कॉन्सिलच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसांनी आज माध्यमांशी संवाद साधला.
ज्यांना स्वतःचं सरकार टिकवता आलं नाही, त्यांच्या नाकाखालून त्यांचं सरकार घेऊन गेलो. ते कशाचे वल्गना करताहेत. हे सरकार राहणार. पुन्हा आमचंच सरकार पुन्हा सत्तेत येणार, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.
आजचा मोर्चा केवळ राजकीय मोर्चा होता. जे लोक संतांना शिव्या देतात, देवदेवतांना शिव्या देतात, वारकरी संप्रादयांना शिव्या देतात. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला, कधी झाला हे माहिती नाही हे लोक कोणत्या तोंडाने मोर्चा काढतात? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान काँग्रेसने केला तेव्हा तुम्ही मोर्चा का काढला नाही? स्वातंत्र्यवीर सावरकर मोठे नाहीत का? केवळ राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न होतोय, असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं. तिन्ही पक्ष विसरले आहेत की कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद हे सरकार आल्यावर सुरू झालेला नाही. हा वाद ६० वर्षे आहे. आतापर्यंत महाराष्ट्रावर ज्यांनी राज्य केलं त्यांनी काहीही केलं नाही. त्यामुळे काहीच मुद्दे न उरल्याने राजकीयदृष्ट्या काढलेला हा मोर्चा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आमचे श्रद्धास्थान कालही होते, आजही आहेत, उद्याही राहणार आहेत. मुंबई तोडण्याच्या मुदद्द्यावरच उद्धव ठाकरेंची कॅसेट अडकली आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही. हे माहित असताना किती दिवस तेच तेच बोलणार. आजच्या भाषणात एकही नवीन मुद्दा नव्हता. केवळ शिवराळ भाषा वापरावी, एवढ्यापुरतं हे भाषण केलं आहे. त्यांनी नवीन लोक नेमले पाहिजेत, जे त्यांना नवीन मुद्दे देतील. काहीतरी नवीन, काहीतरी एकण्यासारखं ते बोलतील एवढी माफक अपेक्षा आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. फेब्रुवारीपर्यंत सरकार टीकणार नाही.