अखेर भूषण कडू कॅमेरासमोर आलाच
बायकोचं निधन, उधारीचं जगणं...जीव देणं हाच पर्याय
मुंबई : काही कलाकार प्रेक्षकांना अनेक वर्ष खळखळून हसवतात, आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रचंड लोकप्रिय होतात मात्र तेच कलाकार अचानक सिनेइंडस्ट्रीतून गायब होतात. ते कुठे आहेत, काय करतायत याबद्दल कुणालाही काहीच कल्पना नसते. असाच एक मराठी चेहरा म्हणजे भूषण कडू. भूषणने अनेक कार्यक्रम, चित्रपट आणि नाटकांतून प्रेक्षकांना पोट धरून हसवलं. मात्र तो अचानक इंडस्ट्रीतून गायब झाला. तो कुठेही दिसेनासा झाला. त्याच्याबद्दल प्रेक्षकांकडून विचारणा होऊ लागली मात्र तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याच्या गर्तेत असा काही अडकला की त्याला त्यातून बाहेर पडणं अशक्य झालं. जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा कुणीही साथ देत नाही असंच काहीसं भूषणसोबतही घडलं. काही वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला आणि त्याचं जणू आयुष्यचं थांबलं. आता अखेर अनेक वर्षांनी भूषण कॅमेरासमोर आला आहे. नुकत्याच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत भूषण त्याच्या आयुष्यात आलेल्या त्या वादळाबद्दल सांगताना दिसतोय. असं नेमकं तेव्हा काय घडलं होतंं?
भूषण कडू कुठे आहे
मुलाखतीत भूषण म्हणतो, ‘मी सध्या काय करतो, भूषण कडू कुठे आहे हा प्रश्न अनेकांना पडला होता. अनेक गोष्टी माझ्याबद्दल रचल्या गेल्या. काहींना तर असंही वाटलं की मी या जगाचा निरोप घेतलाय. माझा एक चित्रपट आहे ‘मस्त चाललंय आमचं’ असं काहीसं आयुष्य सुरू होतं. कादंबरीसारखी बायको माझ्या आयुष्यात आली. मला मुलगा झाला. पण म्हणतात ना चढउतार हे आयुष्याचा एक भाग आहेत. याआधीच मी अनेक दुःख पचवली होती. वडिलांचं जाणं, आईचं जाणं, आजीचं जाणं. त्यात आणखी एक मोठं वादळ माझी वाट पाहत होतं.’
मला खूप मोठा हादरा बसला
‘चांगला संसार सुरू असताना, चांगली कामं करत असताना लॉकडाउन सुरू झाला. करोनाच्या शेवटच्या काळात माझी कादंबरी देवाघरी गेली. मग मात्र मला खूप मोठा हादरा बसला. मुलाला सांभाळायची जबाबदारी होती. ११ वर्षाचं लेकरू. मी एकदम हललो. तीन तीन नाटकं सुरू असायची, मालिका सुरू असायच्या. माझी सगळी मॅनेजमेंट तिचं बघायची. ती गेली. दुःख काही कमी होत नव्हतं. मग मात्र मी स्वतःला पडद्याच्या मागेच ठेवलं. पण मग नंतर मुलाच्या जबाबदारीमुळे पुन्हा कामाला सुरुवात केली.
लोकांचे खरे चेहरे दाखवले
मला सगळीकडे लोक विचारायचे तुझं सध्या काय सुरू आहे, काय काम करतोयस तू? लोकांना समजलं होतं माझ्या पत्नीच्या निधनाबद्दल. कारण बिग बॉसमध्ये त्यांनी माझी फॅमिली पाहिली होती. काही तर असं जाहीर करून मोकळे झाले होते की मी या जगात नाहीये. मला पण करोना झाला आणि मी गेलो. अन या काळाने मला लोकांचे खरे चेहरे दाखवले. माझ्याकडे थोडे पैसे होते साठवलेले पण पत्नीच्या आजारपणात आणि करोना काळात ते सगळे संपले. एक वेळ अशी आली की माझ्याकडे पैसेच नव्हते.
८५० रुपयांची गरज आहे
लोकांसाठी आम्ही कलाकार म्हणजे खूप पैसे असलेले असतो पण आमची खरी परिस्थिती लोकांना कळत नाही. चांगले कपडे, गाडी, आता अशी परिस्थिती होती की गाडी तर आहे पण डिझेल टाकायला पैसेच नाहीत. काम मागायला जायलादेखील हातात पैसे नाहीत. मी एका मित्राला फोन केला आणि सांगितलं मला ८५० रुपयांची गरज आहे तर त्याला खरंच वाटेना. म्हणाला, तू जे जोक करतोस ते टीव्हीवर. माझ्यासोबत गंमत करू नको. जेव्हा आर्थिक चणचण वाढत गेली. तेव्हा मुलालाही त्याला हवं ते देऊ शकत नव्हतो. जुने दिवस असते तर त्याला खूप काही मिळालं असतं पण…
विजय पाटकरांनी एक रक्कम पाठवली
माझ्या सासूबाई, मेहुणा यांनी मला आधार दिला. त्या आहेत त्यामुळे मी मुलाला घरी ठेऊन कामासाठी बाहेर पडू शकतो. काही जणांनी खूप चांगला पाठिंबा दिला आणि काही जणांनी मात्र त्यांची कुवत असूनही काहीच केलं नाही. काही कलाकार मंडळींनी देखील मला मदत केली. म्हणजे विजय पाटकरांनी मला एक रक्कम पाठवली न सांगता. त्यांना परिस्थिती माहीत होती. आणखीही काहींनी मदत केली. पण नंतर वाटलं की ही आर्थिक अडचण जर संपवयाची असेल तर काम करणं गरजेचं आहे.
जीव देण्यापलीकडे मार्ग नव्हता
मी अगदी या सगळ्याला कंटाळलो होतो. जीव देण्यापलीकडे मला मार्ग दिसत नव्हता. पण पुन्हा एकदा देवाच्या मानत वेगळंच काहीतरी होतं. मी प्रयत्न करूनही ते घडलं नाही आणि आज मी पुन्हा एकदा कामासाठी सज्ज झालोय. पण या दिवसांनी मला आपले आणि परके यातला फरक नक्कीच समजावला.





