मनोज जरांगेंना भेटण्यासाठी आलेल्या महिला आंदोलक भावूक; म्हणाल्या..
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. मात्र, मनोज जरांगे यांनी आपण पाणी, उपचार काहीही घेणार नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांच्या आंदोलनस्थळी भेटण्यासाठी आलेल्या एका महिला आंदोलक भावूक झाल्या आहेत.
महिला आंदोलक म्हणाल्या, आरक्षण मिळेल, पण मनोज जरांगेंची एक एक पेशी तुटून ते मरायला लागले आहेत. त्यामुळे आत्ता त्यांना उपचाराची गरज आहे. आपण आज ना उद्या सरकारकडून आरक्षण घेणारच आहोत. परंतु आता आपण बघ्याची भूमिका घेणं म्हणजे आपला अतिशय नालायकपणा आहे, अतिशय मुर्खपणा आहे. आपण मनोज जरांगेंचा जीव गेल्यावर आरक्षण घ्यायचं का?
आरक्षण बघण्यासाठी मनोज जरांगे जीवंत पाहिजे. त्यांनी तपासणीसाठी आणि उपचारासाठी नकार दिला आहे. मात्र, ते आपल्यासमोर जीव देत असतील, तडफडून मरत असतील, तर आपण सर्व बांधवांनी आणि शासनाने ते कसे तडफडून मरत आहेत हे बघायचं का? सरकारला तर त्यांचा जीवच घ्यायचा आहे हे स्पष्ट झालं आहे, असं महिला आंदोलक म्हणाल्या.
हेही वाचा – नवीन घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त न झाल्याने राज्यात पंतप्रधान आवास योजना ठप्प
सरकारला वेळ देऊनही त्यांनी काहीच केलं नाही. ४० दिवसात सरकारने काही प्रयत्न केल्याचं ऐकलं आहे का? विधीमंडळात बैठक घेतली नाही, केंद्रात बैठक घेतली नाही. यांना फक्त पुराव्यांच्या आधारे संसदेत आणि विधीमंडळात विधेयक पारित करायचं होतं. त्यांनी ते केलं नाही. म्हणजे त्यांना माझ्या भावाचा जीव धोक्यात टाकायचा होता. मी माझ्या भावाला असं बघू शकत नाही. तुम्ही प्लिज माझ्या भावाचा जीव वाचवा, अन्यथा मी विष पिऊन मरेन. त्यांना दवाखान्यात घेऊन जा. त्यांची तब्येत खूप गंभीर होत आहे. मी खूप रुग्ण हाताळले आहेत. मला माहिती आहे. त्यांच्यात अजिबात त्राण राहिलेले नाही. ते हात हलवत आहेत, पाय हलवत आहेत, बोलत आहेत म्हणजे त्यावरून तुम्ही असं समजू नका की त्यांची तब्येत चांगली आहे, असं महिला आदोलक म्हणाल्या.
त्यांच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या झाल्या आहेत. त्या गुठळ्या कधीही त्यांच्या मेंदूत किंवा हृदयात अडकून माझ्या भावाचं काहीही होऊ शकतं. त्यामुळे या स्थितीत मला माझा भाऊ महत्त्वाचा आहे. ते उपचार घेत नाहीत तोपर्यंत मी इथून उठणार नाही. मी जीव देईन. माझ्या भावावर उपचार केल्याशिवाय मी जाणार नाही. प्लिज मला भेटू द्या, मी त्यांच्याशी बोलते. मला त्यांच्या पाया पडू द्या. आपण त्यांना उचलून नेऊ, आयसीयूत दाखल करू, असंही महिला आंदोलक म्हणाल्या.