खाद्यतेलाला अजूनही महागाईची फोडणी; आणखी काही दिवस दर चढेच राहणार
– खाद्यतेल आणखी काही दिवस चढेच राहण्याची शक्यता
मुंबईः आंतरराष्ट्रीय स्थितीमुळे खाद्यतेलाची आवक घटली होती. त्या स्थितीत दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने विविध उपाययोजना केल्या. पण त्यानंतरही आयातीचे गणित बिघडलेले असल्याने खाद्यतेल अद्यापही महाग आहे. त्यामुळे हे दर आणखी काही दिवस चढेच राहण्याची शक्यता आहे.
भारत हा जगातील सर्वात मोठा खाद्यतेल आयातक आहे. भारतीय खाद्यपदार्थ मसालेदार, चमचमीत व फोडणीवर आधारित असल्याने आपल्या येथे एकूण गरजेच्या ६० ते ६५ टक्के तेल आयात केले जाते. यामध्ये पामतेल सर्वाधिक प्रमाणात आयात होते. इंडोनेशिया व मलेशियातून हे तेल भारतात आणले जाते. पामतेलाचा वापर रेस्तरां, हॉटेल्स व विविध खाद्यान्न स्टॉल्सधारकांकडून सर्वाधिक होतो. नोव्हेंबर २०२१ ते एप्रिल २०२२ दरम्यान इंडोनेशियाने द्वेष भावनेतून पामतेल निर्यातबंदीचा निर्णय घेतला होता. मागील दोन महिन्यांत त्यांनी तेथून पामतेल निर्यात सुरू केली आहे. पण अद्यापही पूर्ण जोमाने ही आयात होत नसल्याचे चित्र आहे.
भारतात दरवर्षी सरासरी १० लाख दशलक्ष टन पामतेलाची आवक होते. त्यानुसार दर महिन्यात सरासरी साडे आठ दशलक्ष टनाची आयात होणे अपेक्षित आहे. पण यासंदर्भात अखिल भारतीय खाद्यतेल महासंघाच्या आकडेवारीनुसार, १ ते २० जुलै या कालावधीत भारतात जवळपास ६.५५ दशलक्ष टन पामतेलाची आयात झाली. जूनच्या तुलनेत हा आकडा १.९६ टक्क्यांनी कमी आहे. जूनमध्ये सरासरी ७.२० दशलक्ष टनाची आयात झाली. मात्र हे दोन्ही आकडे दरवर्षी होणाऱ्या सरासरी साडे आठ दशलक्ष टनापेक्षा कमीच आहे. हेच प्रामुख्याने खाद्यतेल दर अद्यापही कमी न होण्याचे प्रमुख कारण ठरले आहे.
भारतात पामतेलापाठोपाठ सूर्यफुल तेलाची आयातदेखील होते. युक्रेन-रशिया युद्धाचा या आयातीला फटका बसला होता. त्यातून वाढलेले दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने मागील काही महिन्यांत आयात शुल्कात कपात केली. तसेच प्रत्येक तेल दरात सरासरी १० ते १५ रुपये प्रतिलिटरची कपात केली. पण पामतेल आयातीचे गणित बिघडले असल्याने त्यानंतरही दर अद्याप नियंत्रणात आलेले नाहीत.