‘नेमकचि बोला’ कोणती ‘विचारधारा’?
राष्ट्रवादीच्या निष्ठावंताचा प्रश्न; डॉ. अमोल कोल्हेंची संदिग्ध भूमिका
पुणे : विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवासांपासून रंगल्या होत्या. यावर अजित पवारांनी या चर्चा फेटाळून लावत राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अशातच, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे अमोल कोल्हे यांनी एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट शेअर केला आहे. यावरुनच कोल्हे भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.२३ एप्रिल हा दिवस संपूर्ण जगभरात ‘जागतिक पुस्तक दिन’ साजरा केला जातो. याच निमित्ताने खासदार अमोल कोल्हेंच्या एका पोस्टमुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा पुन्हा एकदा रंगू लागल्या आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अमोल कोल्हे यांनी २०२४ ला मी शरद पवार यांच्यासोबतच असणार आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती. माझ्या विषयीच्या बातम्या पेरल्या जात आहेत. हीच माझ्या कामाची पोचपावती आहे. माझ्या मतदारसंघात सगळ्यात जास्त कामे झाली आहेत, असेही ते माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होती. सध्या राज्यात अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत अद्यापही संभ्रम आहे. त्यात खासदार अमोल कोल्हे यांची गेल्या दीड वर्षांतील वारंवार बदलणारी भूमिका पाहात डॉ. कोल्हे यांनी संदिग्ध वातावरण निर्माण करु नये, अशी अपेक्षा राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
काय आहे अमोल कोल्हेंची पोस्ट…
जागतिक पुस्तक दिनानिमित्त अमोल कोल्हे यांनी ट्विटरवर ही पोस्ट केली आहे. ज्यामध्ये पहिल्या फोटोत त्यांच्या हातात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भाषण संग्रहाचे पुस्तक ‘नेमकचि बोलणे’ हे पुस्तक दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत ‘द न्यू बीजेपी’ नावाचे नलिन मेहता यांचे पुस्तक वाचत असल्याचे दिसत आहे. असा एकत्रित फोटो पोस्ट करीत विचारधारा कोणतीही असो, समजून घेण्यासाठी पुस्तकांशिवाय चांगला गुरू नाही, असा संदेशही डॉ. कोल्हे यांनी दिला आहे.
‘‘द न्यूज बीजेपी’’ आत्ताच का?
भाजपाने शिरुर लोकसभा मतदार संघावर आताच ‘क्लेम’ केला आहे. या मतदार संघात भाजपा-शिवसेना एकत्रित निवडणूक लढवल्यास माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना तिकीटासाठी शिंदे गट आग्रही राहणार आहे. दुसरीकडे, मतदार संघात राष्ट्रवादीच्या स्थानिक आणि मातब्बर नेत्यांपैकी अनेकांनी डॉ. कोल्हे यांच्या विरोधात अप्रत्यक्ष आघाडी उघडली आहे. महाविकास आघाडीत सर्व अलबेल आहे असेही नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या मदतीने २०२४ ची निवडणूक विजयी हाेणे अवघड वाटत असल्यामुळे डॉ. कोल्हे यांनी भाजपासोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. अन्यथा पुरोगामी महाराष्ट्रासाठी भरभरून बोलणारे डॉ. कोल्हे अचानक भाजपाची विचारधारा समजून घेण्याचा प्रयत्न का करतील? असा प्रश्न उपस्थित केला आहे.