अमरावतीत व्यावसायिकाची नैराश्यातून आत्महत्या
अमरावती |
नैराश्यातून शहरातील एका व्यावसायिकाने रेल्वेगाडीसमोर उडी घेऊन आत्महत्या के ल्याची घटना उघडकीस आली आहे. अमरावतीवरून बडनेराच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेमार्गावर या व्यावसायिकाच्या शरीराचे सहा ते सात तुकडे सुमारे अर्धा किलोमीटर सापडले. राजेश दादासाहेब दानखेडे (५९, रा. शंकरनगर, अमरावती) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजताच्या सुमारास राजापेठ पोलिसांना माहिती मिळाली की, अमरावती ते बडनेरा रेल्वेमार्गावरील नवाथे परिसरातील हॉटेलच्या मागे एका व्यक्तीचा मृतदेह पडलेला आहे. ही माहिती मिळताच राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे, योगेश इंगळे, किशोर महाजन व अन्य पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी या मृताच्या शरीराचे अवयव सुमारे अर्धा किलोमीटपर्यंत पसरल्याचे लक्षात आले.
पोलिसांनी अक्षरश: अर्धा किलोमीटपर्यंत जाऊन हात, पाय, धड, डोके व इतरही अवयव गोळा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. सुरुवातीला सुमारे चार ते पाच तास मृतदेहाची ओळख पटली नव्हती. मात्र मृताच्या अंगावरील कपडे व वर्णनाच्या आधारे उशिरा रात्री ओळख पटवण्यात राजापेठ पोलिसांना यश आले. यावेळी मृत व्यक्तीने मुलांच्या व पत्नीच्या नावे चिठ्ठी लिहून ठेवली होती. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दानखेडे यांच्या मृतदेहाजवळ पोलिसांना पत्नी व मुलांचा उल्लेख असलेली चिठ्ठी मिळाली. त्यांनी मुलांना व पत्नीला माफ करा, असे म्हणून तुम्हाला खुशी देऊ शकलो नसल्याचे सांगितले. तसेच मुलांनो आईची काळजी घ्या, असाही त्यांनी चिठ्ठीत उल्लेख केला आहे.