पीक विम्याविषयी शेतक-यांना प्रबोधन करून जलयुक्तची कामे तातडीने पूर्ण करा, आमदार नाईक यांच्या सूचना
शिराळा (प्रतिनिधी) – खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना वेगवेगळ्या जातीची बि-बियाणे उपलब्ध करून देवून पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करावे आणि जलयुक्त शिवार योजनेतील सर्व कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सुचना आमदार शिवाजीराव नाईक यांनी तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीच्या बैठकीत दिल्या.
तहसील कार्यालयाच्या सभागृहात आज बैठक घेण्यात आली. बैठकीत प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, सभापती मायावती कांबळे, नायब तहसीलदार के. जी. नाईक, कार्यकारी अभियंता पृथ्वीराज चव्हाण, गटविकास अधिकारी सुनील बागल यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले की, काही दिवसात पावसाळा सुरू होईल. खरीप हंगामातील शेतीची कामे सुरु झाली आहेत. पेरणीसाठी शेतकऱ्यांना योग्य प्रकारची बि-बियाणे व खाते द्यावीत. तालुका कृषी विभागाने पिक विम्यासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करावे. शेतात काम करताना शेतकरी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याकरिता अपघात विमा याबाबत जागृती करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मांगले येथील तालुका क्रीडांगणाची अपूर्ण असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत. पाटबंधारे विभागाने वाकुर्डे योजनेच्या पाण्याच्या पंपाची चाचणी घेतलेले वीज बील माफ करणेसाठी तातडीने शासन स्तरावर पत्रव्यवहार करावा. लघु पाटबंधारे विभागाने गिरजवडे मध्यम प्रकल्पामध्ये बाधीत शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला तातडीने द्यावा. या तलावाचे काम जलदगतीने पूर्णत्वास न्यावे.
मणदूर खुंदलापूर रस्त्यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेतून २ कोटी रुपये मंजूर झाले असून प्रत्यक्षात काम चालू झाले आहे. परंतु, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याचे काम अडवले आहे. या रस्त्यासाठी यापूर्वी दोनवेळा शासनाचा मोठ्या प्रमाणावर निधी खर्च झाला आहे. वनविभागाने यामधील तांत्रिक अडचणी दूर कराव्यात किंवा खुंदलापूरचे पुनर्वसन तातडीने करावे. अन्यथा सदर रस्त्याला अडथला करत असलेबाबत जिल्हाधिकारी यांचेकडे व जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना खुलासा द्यावा लागेल.
तालुका समन्वय व पुनर्विलोकन बैठकीला जे अधिकारी गैरहजर राहिले, त्यांना प्रांताधिकारी यांनी नोटीसा देवून खुलासा मागवावा. बैठकीस भाजपाचे तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील, वनक्षेत्रपाल तानाजीराव मुळीक, कृषी अधिकारी भगवानराव माने, सदस्य दिपक पाटील, संदीप तडाखे, आनंदराव पाटील, मुख्याधिकारी अशोक कुंभार, आगार व्यवस्थापक एस. बी. फरांदे, उप अभियंता एस. ए. देसाई, सार्वजनिक बांधकामचे उप अभियंता दाभोळे यांचेसह इतर विभागाचे अधिकारी व तालुक्यातील जनता उपस्थित होती.