‘डोंबिवली एमआयडीसीतील अतिधोकादायक कंपन्या तात्काळ बंद करण्याचा निर्णय;’ मुख्यमंत्री
मुंबई : मानवी जीविताला हानीकारक ठरणाऱ्या डोंबिवली एमआयडीसीतील अतिधोकादायक कंपन्या तात्काळ बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अतिधोकादायक कंपन्यांना पर्याय म्हणून त्यांनी आपल्या कंपनी उत्पादन प्रक्रियेत अभियांत्रिकी, कापड किंवा अन्य बदल करून ते आहे त्या जागेत चालू ठेवावेत.
असे बदल ज्यांना करायचे नसतील त्यांंनी शहरा बाहेर शासनाने भूसंपादित केलेल्या जागेत स्थलांतरित व्हावे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवली एमआयडीसीतील जळीत अमुदान कंपनीला गुरुवारी रात्री भेट दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना दिली.
हेही वाचा – ‘भारतात पैशाची नाही तर प्रामाणिक नेत्यांची कमतरता’; नितीन गडकरींचं विधान
गुरुवारी (दि. 23) डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 2 मधील अमुदान केमीकल कंपनीत बाॅयलरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत सहा कामगारांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.
या स्फोटाचा आवाज इतका भीषण होता की, परिसरातील दोन किमी अंतरावरील जमीन हादरली. काही घरांच्या आणि रस्त्यावरील गाड्यांच्या काचा फुटल्या. दरम्यान आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 ते 6 बंबांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या दुर्घटनेत जवळपास 50 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी अतिधोकादायक कंपन्या तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.