बोरपाडा धरणात दोन अल्पवयीन मुली पाण्यात बुडाल्या
जीवलग मैत्रिणींचा एकत्रच अंत
नंदुरबार : बेडकी गावात दोन अल्पवयीन मुलींचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. उज्वला जयंत्या गावीत (वय 16) व मिखा सानु गावीत (वय 16) या दोघी मैत्रिणी गावा जवळ असलेल्या बोरपाडा धरणात दोन दिवसांपूर्वी दुपारच्या वेळी अंघोळीसाठी गेल्या होत्या. किनाऱ्यावर अंघोळ करताना त्यांचा पाय घसरला. दोघी धरणाच्या खोल पाण्यात गेल्याने दोघींचा बुडून मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच गावकऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने धरणातून मृतदेह बाहेर काढला.
दोघी मुलींच्या मृत्यूमुळे बेडकी गावावर शोककळा पसरली आहे. कुटुंबातील सदस्यांनी एकच आक्रोश करत टाहो फोडला. दोन्ही मयत मुलींचे विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. महाराष्ट्रात गेले काही दिवस नदीपात्रात व धरणात बुडून मृत्यू होण्याच्या काही घटना घडल्या आहेत.
उजनी धरणाच्या जलाशयात करमाळा तालुक्यातील कुगाव (जि. सोलापूर) ते इंदापूर तालुक्यातील कळाशी दरम्यान नौका उलटून सहा जण पाण्यात बुडाले होते. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली होती. ज्यात बुडालेली नौका १७ तासांनी ३५ फूट खोलीवर सापडली. गुरुवारी सहा जणांपैकी तिघांचे मृतदेह अखेर सापडले आहेत आणि बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरु आहे. या धरणात एकाच कुटुंबातील ४ जण बुडाले आहेत.
अकोले तालुक्यातील सुगाव गावाजवळ एक घटना घडली होती ज्यात प्रवरा नदीत दोन जण बुडाले होते. शोध घेण्यासाठी एसडीआरएफ पथकाची मदत घेण्यात आली होती. यावेळी एसडीआरएफच्या पथकातील चार जवान आणि एक स्थानिक व्यक्ती असे पाचजण बोटीतून त्या बुडालेल्या व्यक्तीच्या शोधात निघाले होते. मात्र, प्रवरा नदीत एसडीआरएफ जवानांची बोट उलटली. या घटनेत बोटीतील पाचही जण नदीत बुडाले. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे तर दोघांचा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.