#CycloneTauktae: तटरक्षक दलाने पाच दिवस आधीच ओएनजीसीला दिली होती जहाजं परत बोलवण्याची सूचना
मुंबई |
तौक्ते चक्रीवादळाचा ‘बॉम्बे हाय’ क्षेत्रात असलेल्या तेल उत्खनन करणाऱ्या तराफ्यांना मोठा तडाखा बसला. वादळाच्या तडाख्यात सापडून पी-३०५ हा तराफा बुडल्याची माहिती समोर आली होती. तराफ्यावरून एसओपी संदेश मिळाल्यानंतर चक्रीवादळ आणि मुसळधार पावसातच नौदलाने युद्धपातळीवर शोध मोहीम हाती घेतली. बुधवारी सकाळपर्यंत १८४ जणांना वाचवण्यात नौदलाला यश आलं. तर आता २२ जण मरण पावले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान वादळाच्या पार्श्वभूमीवर तटरक्षक दलाने ओएनजीसी आणि ऑफशोर डिफेन्स अॅडव्हायझरी ग्रुप (एफओडीएजी) यांना जहाजे बंदरावर परत बोलवण्याच्या आधीच सूचना दिली होती अशी माहिती समोर आली आहे. मात्र त्यांनी ही सूचना न पाळण्याने एवढी मोठी दुर्घटना घडली आहे.
“तटरक्षक दलाने ओएनजीसी आणि एफओडीएजीला समुद्रातून सर्व जहाजे परत बोलावण्याची सूचना देण्यात आली होती. तरीही ओएनजीसीने दिलेल्या माहितीचे पालन का केले नाही, हा एक प्रश्नच आहे,” असे तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे कमांडंट जनरल इंस्पेक्टर जनरल आनंद बडोला यांनी सांगितले. चक्रीवादळ येण्याआधीच मासेमारी करणाऱ्या ४,२२१ बोटी या किनाऱ्यावर आल्या होत्या असे बडोला यांनी सांगितले. तटरक्षक दलाने ११ आणि १३ मे रोजी सर्व कंपन्यांना सूचना दिली होती. केंद्रीय संरक्षण व गृह मंत्रालयांनाही यासंदर्भात कळवण्यात आलं होतं. अफकॉन्सने त्यांची माणसे समुद्रात पाठवली होती अशी माहिती ओएनजीसीचे प्रवक्ते हरीश अवल यांनी दिली आहे. ओएनजीसीचे डेप्युटी जनरल मॅनेजर (मॅकेनिकल) बी पांडे यांनीही अफकॉन्सला या प्रकरणी दोषी ठरवले आहे. अफकॉन्स ही ओएनजीसीची सहाय्यक एजन्सी आहे. अफकॉन्सची तीन बार्ज हे वादळामुळे समुद्रात अडकली होती. त्यापैकी पी-३०५ बुडाले. अद्याप ६० लोक बेपत्ता आहेत. पी-३०५ वरील बेपत्ता असलेल्यांचा मृत्यू झाल्याचं अद्याप कळू शकलेलं नाही, असंही ते म्हणाले. पी ३०५ तराफ्यावरील ६० कर्मचारी अद्यापही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्याचं काम अजूनही सुरूच आहे.
वाचा- ‘म्युकरमायकोसिस’वर उपचारांसाठी पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय