#coronolockdown:अत्यावश्यक सेवेचा गैरवापर करत मुंबई ते सांगली प्रवास, तरुणीला कोरोनाची लागण, पाच जणांवर गुन्हे
सांगली : अत्यावश्यक सेवेचा गैरवापर करुन मुंबईहून गावी आलेल्या तरुणीला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक घटना सांगलीत घडली. आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि संचारबंदीचं उल्लंघन करत या तरुणीला आणि तिच्या भावाला अत्यावश्यक सेवेचा गैरवापर करत मुंबईहून गावी आणण्यात आलं होतं. याप्रकरणी तरुणीसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगलीतील शिराळा तालुक्यातील निगडी खुर्द येथे कोरोनाग्रस्त तरुणीला आणि तिच्या भावाला मुंबईहून आणण्यात आलं होतं. कॅन्सर रुग्णाला उपचारासाठी मुंबईला नेण्यासाठी ऑनलाईन अत्यावश्यक सेवेचा पास काढण्यात आला होता. त्यानंतर मुंबईत रुग्णाला रुग्णालयात दाखल करुन गावी परतत असताना 23 वर्षीय तरुणी आणि तिच्या भावाला मुंबईहून गावी आणले. मुंबईहून आलेल्या या तरुणीला आता कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
त्यानंतर 23 वर्षीय कोरोनाग्रस्त तरुणीसह पाच जणांवर शिराळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा, संचारबंदीचं उल्लंघन यांसह अन्य गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
मालती पाटील नावाच्या एका कॅन्सर रुग्णाला उपचारासाठी मुंबईला नेण्यासाठी प्रदीप पाटील याने ऑनलाईन जिल्हा पोलीस प्रमुखांच्या परवानगीचा पास काढला. त्यानंतर मालती यांना मुंबईतील रुग्णालयात सोडल्यानंतर प्रदीप पाटील आणि त्यांचे सहकारी गावातील एक तरुणी आणि तिचा भाऊ जे मुंबईत राहत होते त्यांना बेकायरेशीररित्या गावी घेऊन आले.
याप्रकरणी गणपती भालेकर, प्रदीप पाटील, रामचंद्र भालेकर यांच्यासह मुंबईतून आलेल्या भाऊ आणि कोरोना पॉझिटिव्ह बहिणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कोरोनाबाधित तरुणीच्या कुटुंबातील 7 जणांना क्वारंटाईन आणि 4 जणांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात आलं आहे.