#CoronaVirus: लक्षणं नसलेल्या व्यापाऱ्यांना कोरोना चाचणीची गरज नाही, राज्य सरकारकडून नागपुरातील दुकानदारांना दिलासा
नागपूर: राज्य सरकारकडून कोरोना चाचणी नेमकी कुणाची करावी, याबाबत प्रशासनाला सूचना देणारं परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. या परिपत्रकात लक्षणं नसलेल्या व्यापाऱ्यांना कोरोना चाचणीची गरज नाही, असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यामुळे नागपुरातील 20 हजार व्यापाऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील प्रत्येक दुकानदार आणि दुकानात काम करणाऱ्या कामगारांना कोरोना चाचणी बंधनकारक केली होती. चाचणी न केल्यास दुकानदारांवर कारवाई करण्याचा इशारा मुंढे यांनी दिलेला होता. त्यामुळे नागपुरातील व्यापारी वर्गामध्ये नाराजीचा सूर होता. अनेक व्यापाऱ्यांनी तुकाराम मुंढे यांच्या या निर्णयाचा जाहीरपणे विरोधही केला होता. मात्र, आता राज्य सरकारच्या परिपत्रकाने व्यापाऱ्यांना दिलासा मिळालेला आहे.
कोरोनाची चाचणी नेमकी कुणाची करावी?
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी चाचणी करणं जरुरीचं आहे. मात्र, जे रुग्णांच्या संपर्कात गेले आहेत त्यांचीच चाचणी करणं जास्त गरजेचं आहे. कारण प्रत्येकाची चाचणी करणं अद्याप शक्य नाहीय. कारण चाचण्यांवरील ताण वाढतो आहे. याशिवाय शासनाचा आर्थिकभारही वाढतो. त्यामुळे राज्य सरकारकडून नेमक्या चाचण्या कुणाच्या कराव्यात याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.
1. कोरोना चाचण्या करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या व्यक्तीची विभागणी तीन गटामध्ये करण्यात आली आहे. प्रत्येक गटासाठीचा चाचणीचा प्रकार त्याअंतर्गत नमूद केला आहे. त्यानुसार ज्या व्यक्तींना उपचारासाठी त्वरित चाचणी करणे आवश्यक आहे, अशांची अँटीजन चाचणी करण्यात यावी. त्यामुळे अशा रुग्णांच्या उपचाराबाबत अर्ध्या तासात निर्णय घेता येणे शक्य होईल.
2. RTPCR चाचणी ही अँटीजन चाचणी नकारात्मक आलेले आणि लक्षणे असणारे रुग्ण, पॉझिटिव्ह व्यक्तींचे High Risk Contact आणि परदेशातून येणाऱ्या व्यक्तींची कोरोना चाचणी घेण्यात यावी.
3. Brought dead व्यक्ती, बाळंतपणासाठी आलेल्या माता, Emergency Operation रुग्ण इत्यादी व्यक्तींची True nat चाचणी करण्यात यावी. ज्या ठिकाणी True nat सुविधा उपलब्ध नाही अशा ठिकाणी या व्यक्तींची अँटीजन चाचणी करण्यात यावी.
4. मनोरुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना प्रथम एक आठवडा क्वारंटाईन ठेवण्यात यावे. त्यानंतर अँटीजन चाचणी करावी, त्यानुसार आयसोलेशन वॉर्ड किंवा रुग्णालयातील संबंधित वॉर्डमध्ये दाखल होण्याचा निर्णय घेण्यात यावा.
5. एखादा कैदी दाखल झाल्यानंतर त्याला एक आठवडा क्वारंटाईन ठेवण्यात यावे. त्यानंतर अँटीजन चाचणी करावी. चाचणीच्या निष्कर्षानुसार आयसोलेशन, कोव्हिड रुग्णालय दाखल करण्याबाबतचे निर्णय घेण्यात यावे.
6. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये एकाच रुग्णांच्या दोन-तीन चाचण्या करण्यात येतात. त्यामुळे चाचण्यांवरील ताण वाढतो, त्याचबरोबर शासनाचा आर्थिकभारही वाढतो. त्यामुळे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक व्यक्तींची प्रोटोकॉलनुसार चाचणी करावी, अधिकच्या चाचण्या करु नयेत.
7. प्रवास करणाऱ्या व्यक्ती, जिल्ह्यात दाखल होणाऱ्या व्यक्ती, व्यापारी अशांची त्यांना कोरानाची लक्षणे नसल्यास चाचणी करण्यात येवू नये.