breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमुंबई

#CoronaVirus: मुंबईहून आलेल्या चार जणांना कोरोनाची बाधा

मुंबईहून आलेल्या आठ वर्षांच्या मुलीसह चार जणांचे करोना चाचणी अहवाल बुधवारी सकाळी सकारात्मक आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. यामुळे जिल्ह्य़ातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ९२ वर पोहोचली असून यापैकी ४७ रुग्ण करोनातून मुक्त झाले आहेत.

मुंबईतून जिल्ह्य़ात येत असलेल्या नागरिकांना स्थानिक पातळीवरील आपत्कालीन समिती आणि वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून तत्काळ अलगीकरण करण्यात येत आहे. अलगीकरण कक्षामध्ये वास्तव्य असलेल्यांची रोजच्या रोज वैद्यकीय तपासणी पथकाकडून केली जात असून करोनासदृश लक्षणे आढळताच त्यांना तत्काळ मिरजेतील करोना रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात दाखल करून त्यांची करोना चाचणी करण्यात येत आहे.

अशाच चार रुग्णांची करोना चाचणी बुधवारी सकाळी सकारात्मक आली आहे. हे सर्व रुग्ण मुंबईहून आले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले. खानापूर तालुक्यातील सुलतानगादे  येथील ५७ वर्षीय महिला दि. २२ मे रोजी, शिराळा तालुक्यातील करंगुली येथील ३३ वर्षीय पुरुष दि. १७ मे रोजी आणि कडेगाव तालुक्यातील आंबेगाव येथील ३६ वर्षीय पुरुष दि. २४ मे रोजी मुंबईहून आला होता. या तिघांना करोनाची लागण झाली आहे. तसेच कवठेमहांकाळ तालुक्यातील लांडगेवाडी येथील आठ वर्षीय मुलगी २३ मे रोजी मुंबईहून आल्याने विलगीकरण कक्षामध्ये होती. तिला ही करोनाची लागण झाली आहे. या सर्वावर मिरजेच्या सामान्य रुग्णालयामध्ये आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत. सुलतानगादे, करंगुली व आंबेगाव येथे प्रतिबंधित क्षेत्र लागू करण्याची कार्यवाही तसेच अन्य  प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी दिली.

दरम्यान, मिरज शहरातील होळी कट्टा परिसरातील मुख्य रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे आदेश आज देण्यात आले. या परिसरात रुग्ण सापडल्याने ही नाकाबंदी करण्यात आली होती. बुधवारी खासदार संजयकाका पाटील, आ. सुरेश खाडे, उपमहापौर आनंदा देवमाने, नगरसेवक निरंजन आवटी, पांडुरंग कोरे, गणेश माळी, गजानन कुल्लोळी, सुकुमार पाटील आदींनी या भागास भेट दिली. या वेळी येथे वास्तव्य करीत असलेल्या नागरिकांनी करोनाचा संसर्ग सध्या टळला असल्याने हा शहरातील मुख्य रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी केली. यानंतर खा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची भेट घेऊन नागरिकांची होत असलेली गरसोय प्रशासनाच्या कानी घातली. शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकल्यानंतर हा मार्ग खुला करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button