#CoronaVirus: मुंबईहून आलेली तरूणी निघाली कोरोना पॉझिटिव्ह
वर्धा : करोना विषाणूचा फैलाव कमी करण्याचे प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकार आपापल्या परीने करत आहेत. पण अद्याप तरी त्याचा प्रादुर्भाव वाढण्याचीच चिन्हे दिसत आहेत. मुंबईसारख्या गर्दीच्या ठिकाणाहून गावाकडे जाणाऱ्यांमुळे गावातही करोनाने शिरकाव केल्याचे चित्र आहे. बाहेरून येणाऱ्या व्यक्तींमुळे रुग्णसंख्येत सतत भर पडत आहे. मुंबईहून आष्टी तालुक्यात आलेली एक युवती करोनाबाधित असल्याचा अहवाल हाती आला आहे.
करोनाबाधित तरुणीचा भाऊ मुंबईहून तिला कारने ८ दिवसांपूर्वी घेऊन आला. त्यानंतर ५ व्यक्तींचे संपूर्ण कुटुंब गृह विलगिकरणात होते. दोन दिवसांपूर्वी तरूणीमध्ये करोनाची लक्षणे आढळल्याने तिला सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. तिचा करोना चाचणी अहवाल शुक्रवारी सकाळी प्राप्त झाला. त्यात ती करोना विषाणूने बाधित असल्याचे निष्पन्न झाले. या तरूणीवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर कुटुंबातील इतर चौघांना सामान्य रुग्णालयात ‘आयसोलेशन कक्षात’ ठेवण्यात आले आहे.
यापूर्वी वर्ध्यात आलेले वाशीम, अमरावती, नवी मुंबई, गोरखपूर येथील नऊ रूग्ण उपचार घेत आहेत. आर्वीतील महिलेचा मृत्य झाला असून सेवाग्राम व सावंगीच्या रुग्णालयात दहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आर्वीत एकमेव कन्टेन्मेंट झोन असून त्यात ११ हजार ३९५ व्यक्तींचे सर्वेक्षण झाले आहे. एकूण १०,०११ व्यक्ती गृह विलगिकरणात तर १२६ व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणातील आहेत.