शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणारे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात महाविकास आघाडी आक्रमक
कृषिमंत्र्यांचे करायचे काय खाली डोके वर पाय…
मुंबई : शेतकरी आत्महत्या हा आजचा विषय नाही, असं बेजबाबदार वक्तव्य कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं. यावरून आता विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणारे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात आक्रमक होत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केलं आहे.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात विरोधीपक्षाच्या आमदारांनी या कृषिमंत्र्यांचे करायचे काय खाली डोके वर पाय… निवडणुकीचा गाजर हलवा… महाराष्ट्राचे बजेट, गाजर हलवा…खोके सरकार हाय हाय… ५०० कोटींचा घोटाळा करणार्या आमदार राहुल कुलवर कारवाई झालीच पाहिजे…सट्टा लावतो म्हणणार्या मंत्र्यांचा धिक्कार असो… अशा गगनभेदी घोषणांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.
दरम्यान, शेतकरी आत्महत्या काही आजचा विषय नाही, अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात. तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी कृषी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी तयार करण्यात आली आहे, असं वक्तव्य कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.