#Coronavirus: भारतात 536 कोरोना बाधित, तर 11 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली असून 536 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत 11 लोकांनी या व्हायरसमुळे आपला जीव गमावला आहे. आज तमिळनाडूतील मदुरईमद्ये एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर काल मुंबईमध्ये एका व्यक्तीचा तर दिल्लीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. एकूण 536 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 476 भारतीय नागरिक आहेत, तर 43 विदेशी नागरिक आहेत. दिलासादायक बातमी म्हणजे, आतापर्यंत 40 जणांना कोरोनामुक्त करण्यास यश आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री आठ वाजता देशाला संबोधित केलं. त्यावेळी बोलताना त्यांनी 21 दिवसांसाठी संपूर्ण भारतात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. बोलताना त्यांनी सांगितले की, ‘कोरोनामुळे देशासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. या महारोगाचा संसर्ग इतक्या झपाट्यानं होत आहे की, त्यांची साखळी तोडण्याशिवाय देशासमोर कोणताही पर्याय नाही. त्यामुळे पुढील 21 दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात येणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. जनता कर्फ्यूला सफल करण्यात सर्व भारतीयांचा हात आहे. जेव्हा देशात संकट येते तेव्हा सर्व एकत्र येतात त्यांमुळे सर्व भारतीय या यशाचे शिल्पकार आहे, असे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.