#CoronaVirus: भाजपा नेत्याच्या एका ट्विटमुळे संपूर्ण देशच लागला अंताक्षरी खेळायला
अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या करोना विषाणूनं भारतातही झपाट्यानं पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. दिवसेंदिवस महाराष्ट्रासह देशातील करोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. गर्दीमुळे करोनाचा संसर्ग वेगानं वाढत असल्यानं केंद्राबरोबर राज्यातील सरकारांकडून लोकांना बाहेर न पडण्याचं आवाहन केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधताना आज (२२ मार्च) जनता संचारबंदी (जनता कर्फ्यू) पाळण्याचं आवाहन केलं आहे. जनता कर्फ्यूला देशभरातील अनेक राज्यांमधून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आज करोडो भारतीयांनी घरामध्येच बसण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सोशल नेटवर्किंगवरील उत्साहामध्ये थोडाही फरक पडलेला जाणवत नाही. अनेकांनी घरी कटांळा येतोय, काय करावं कळत नाहीय असं अनेक ट्विट केले आहेत. मात्र केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी एक ट्विट करत संपूर्ण देशालाच ट्विटवर अंतारक्षरी खेळण्याचं आवाहन केलं आहे. इराणी यांनी #twitterAntakshri हा हॅशटॅग वापरुन चला अंताक्षरी खेळू असं म्हटलं आहे. त्यामुळे हा हॅशटॅग सध्या टॉप ट्रेण्डींग आहे.
करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळले पाहिजे म्हणजेच सोशल डिस्टन्सींग ठेवलं पाहिजे याच हेतूने देशातील अनेक शहरांमध्ये हळूहळू सार्वजनिक सेवा बंद करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. राजस्थानमध्ये पूर्णपणे लॉकडाऊन तर पंजाबमधील पाच जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. केंद्र सरकारने सर्व प्रवासी वाहतूक ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पुढील काही दिवस लाखो लोकांना घरीच थांबवं लागणार आहे. हा निर्णय जनता कर्फ्यूच्या दिवशी घेण्यात आला आहे. जनता कर्फ्यूमुळे आज अनेकजण घरी आहेत. त्यामुळेच टीपीकल भारतीयांप्रमाणे सगळे एकत्र जमले आणि काही करायला नसल्यावर अंताक्षरी म्हणजेच गाण्यांच्या भेंड्या खेळल्या जातात. आज मोदींच्या आवाहानाला साद देत घरांमध्ये थांबलेल्या भारतीयांनी एकत्र येऊन अंताक्षरी खेळावी असं आवाहन स्मृती इराणी यांनी केलं आहे.