#CoronaVirus: “देशामध्ये कोरोना विषाणूचा वेग मंदावला आहे”- केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन
“देशामध्ये कोरोना विषाणूचा वेग मंदावला आहे. संपूर्ण परिस्थिती पाहता असे म्हणता येईल की आपण कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या स्थिरतेकडे जात आहोत”, असे मत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केलं आहे. तसंच, देशाला आशा आहे की येत्या काही आठवड्यांत आपण या कोरोना विषाणूच्या संक्रमणावर मात करण्यात यशस्वी होऊ शकतो, असे देखील त्यांनी सांगितले.
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की, देशामध्ये कोरोना रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण १९.३६ टक्क्यांवर पोहचले आहे. तर कोरोनाबाधित रुग्णांचे दुप्पट होण्याचे प्रमाणही हळू-हळू कमी होत आहे. गेल्या सात दिवसांतील आकडेवारीवर नजर टाकल्यास कोरोनाचे संक्रमण ९ दिवसानंतर दुप्पट होत आहे. गेल्या १४ दिवसांमध्ये हे प्रमाण ७.२ टक्के झाले आहे. हा बदल परिस्थिती सुधारण्याचे संकेत दर्शवत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. हर्षवर्धन यांनी पुढे सांगितले की, देशातील १३६ जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त आहे. २७६ जिल्हे ऑरेंज झोन आहे. याठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या कमी आहे. तर देशातील ७३३ जिल्ह्यांपैकी ३२१ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे संक्रमण नाही.’ तसंच, जर रेड झोनमध्ये १४ दिवसांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळत नसेल तर त्याठिकाणी ऑरेंज झोन केले जात आहे. आणि ऑरेंज झोनमध्ये १४ दिवसांत एकही रुग्ण आढळला नसेल तर ग्रीन झोन केले जात आहे, असे त्यांनी सांगितले.