#CoronaVirus | जालन्यात आणखी चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू
जालना । जालन्यात आणखी चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या ही आता 49 वर जावून पोहोचली आहे. यामध्ये जालना शहरातील रामनगर येथील एका 65 वर्षीय वृद्धास श्वसनाचा त्रास होत असल्याने 12 जुलैला जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. त्या वृद्धाचा बुधवारी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर भावसार गल्लीतील एका 35 वर्षीय पुरुषाला निमोनिया आणि श्वसनाचा त्रास असल्याने 9 जुलैला दाखल करण्यात आले होते. त्याचा बुधवारी मृत्यू झाला.
त्याचबरोबर इंदिरानगरमधील 56 वर्षीय महिलेचा देखील कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच भोकरदन तालुक्यातील धावडा येथील 48 वर्षीय पुरुषाचा 14 जुलैला मृत्यू झाला असून, त्याचा अहवालही पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. या चौघांच्या मृत्यूनंतर जिल्ह्यातील मृतांचा आकडा हा आता 49 वर जाऊन पोहोचला आहे. तर कोरोनाबाधितांची संख्याही 1102 वर गेली आहे. त्यामुळे जालनासारख्या जिल्ह्यातही कोरोनाने चांगलेच थैमान घातले असून जिल्हा प्रशासनाची चिंता वाढतच चालली आहे.