#CoronaVirus: गाडय़ा जमा करण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश
संचारबंदी असतानाच्या काळातही गंमत म्हणून रस्त्यावर येणाऱ्यांना दंडक्यांचा प्रसाद देणाऱ्या पोलिसांना, अशा व्यक्तींच्या गाडय़ांच्या चाव्या पोलीस ठाण्यात जमा करण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय जीवनाश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकडूनही चारचाकी वाहनांचा वापर करून दुकानांभोवती गर्दी केली जात असल्याचे आढळून आल्याने अशा गाडय़ा थेट पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेशही पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. त्याचवेळी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी ओळखपत्रे जारी करण्यासही पोलीस ठाण्यांना सांगण्यात आले आहे.
संचारबंदी लागू झाल्यानंतर याबाबतच्या आदेशानुसार चार किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊ नये, असे त्यात नमूद करण्यात आल्यामुळे एकही व्यक्ती वा वाहन रस्त्यावर दिसता कामा नये, असे अपेक्षित आहे. प्रामुख्याने घरातील एकच व्यक्ती जीवनाश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी बाहेर पडावी, असे अपेक्षा आहे. असे असतानाही काही रिकामटेकडे गंमत म्हणून फेरफटका मारण्यासाठी जात आहेत. त्यांची गय न करण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी बजावले आहे. मात्र त्याचवेळी जीवनाश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकाला त्रास न देण्यासही त्यांनी सांगितले आहे. टवाळखोरांना मात्र पोलीस अडवत असून त्यांना दंडुकांचा प्रसाद दिला जात आहे. दुचाकी घेऊन पोलिसांना चकविण्याचा प्रयत्न करतानाही हे दिसत आहे. त्यामुळे अशा टवाळखोरांच्या गाडय़ा जप्त करून पोलीस ठाण्यात जमा करण्याचा बिनतारी संदेश पोलीस आयुक्तांनी दिला आहे. याशिवाय खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांकडूनही चारचाकी वाहने रस्त्यावर आणून संचारबंदीच्या आदेशाचा भंग केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या वाहनांवरही कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे. नागरिकांना त्यांना आवश्यक तेवढय़ाच वस्तुंची खरेदी करावी, असे आदेश असतानाही प्रत्यक्षात नागरिकांकडून मोठा साठा खरेदी केला जात आहे. दुकानदारही त्यांना आळा घालत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या मंडळींच्या गाडय़ाच जप्त केल्या तर त्यांच्याकडून खरेदीही माफक केली जाऊ शकते, या अपेक्षेने त्यांच्या गाडय़ा ताब्यात घेण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.