#CoronaVirus: कोरोनानं स्वावलंबी बनण्याचा मार्गावर चालण्याचा संदेश दिला: पंतप्रधान मोदी
करोनामुळे आपल्या समोर अनेक समस्या आल्या. अनेक समस्या अशा होत्या ज्यांची आपण कधी कल्पनाही केली नव्हती. या समस्यांनी आपल्याला खुप काही शिकवलं. यामुळे आपल्याला स्वावलंबी बनण्याच्या मार्गावर चालण्याचा संदेश मिळाला असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. पंचायत राज दिनानिमित्त त्यांनी देशातील सरपंचांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वामित्व योजनेची सुरूवात करण्यात आली. करोनानं आपल्याला स्वावलंबी बनण्यास शिकवलं. स्वावलंबी बनल्याशिवाय कोणत्याही संकटाचा सामना करणं अशक्य आहे. गाव, जिल्हे, राज्य, देश हे या निमित्तानं आपापल्या स्तरावर स्वावलंबी बनले. यापुढे आपल्याला कोणत्याही गोष्टींसाठी बाहेरच्या कोणावरही अवलंबून राहावं लागू नये इतकं स्वावलंबी राहावं लागेल, असंही मोदी यावेळी म्हणाले.
गावातून मिळणारं ज्ञान अनेकांना प्रेरणा देणारं
करोनाने दाखवून दिलं की देशातील गावांमध्ये राहणाऱ्या लोकांनी जरीही त्यांनी मोठ्या विद्यापीठातून शिक्षण घेतलं नाही त्यांनी खुप काही करून दाखवलं आहे. गावातून येणारे आकडे हे सर्वांना शिकवण देणारे, देशाला प्रेरणा देणारे आहेत. देशाला प्रेरणा देण्याचं काम गावातील जनतेनं केलं आहे. सोशल डिस्टन्सिंग, लॉकडाउन अशा मोठ्या शब्दांचा प्रयोग न करता ‘दो व्यक्ती दुरी का’ अशा शब्द वापरून करोनाचा सामना केला. यावरूनच सर्वत्र करोनाचा भारतानं कसा सामना केला याची सर्वत्र चर्चा होता. भारताचा नागरिक कठिण परिस्थितीत त्याच्या समोर झुकण्यापेक्षा त्याचा सामना करत आहे. असंही ते म्हणाले.