#CoronaVirus: केंद्र सरकारचा एक निकष महाराष्ट्राला पडला महागात
सोमवारी महाराष्ट्रात दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या, ज्या जनतेच्या चिंतेत भर घालणाऱ्या ठरल्या. सुरूवातीच्या आठवड्यात वीसच्या घरात असलेली राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ८९ वर गेली. दुसरी महत्त्वाची म्हणजे महाराष्ट्र संचारबंदीच्या चौकटीत फेकला गेला. सध्या महाराष्ट्रात दुसऱ्यात असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगितलं जात आहे. सरकार संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार झटत आहे. पण, वाढता आकडा सरकारबरोबरच नागरिकांसमोर मोठं आव्हान उभं करू लागला आहे. पण, मूळ प्रश्न असा आहे की, याची सुरूवात झाली कशी. महाराष्ट्रात करोनाचा विषाणू येण्याला केंद्र सरकारचा एक निकष कारणीभूत ठरला. त्यामुळे महाराष्ट्रावर आजची स्थिती ओढवली आहे.
चीनमध्ये करोनाचा (कोव्हिड-१९) उद्रेक झाल्यानंतर सर्वत्र फक्त त्यावर चर्चा सुरू झाली. मात्र, हवाई वाहतूक सुरूच होती. त्यामुळे हा विषाणू पर्यटन आणि इतर कारणास्तव चीनमधून परतणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून इतर देशात पोहोचला. भारतात आधी केरळमध्ये करोनाग्रस्त रुग्ण सापडले. तोपर्यंत देशाच्या इतर भागात कुठेही करोनाबाधित रुग्ण आढळून आले नव्हते. दरम्यान, १० मार्चला धुळवडीच्या दिवशी महाराष्ट्रात दोन करोनाग्रस्त रुग्ण आढळून आले अन् खळबळ उडाली.
नेमकं काय घडलं?
परदेशातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्याची व्यवस्था विमानतळांवर करण्यात आली. मात्र, सुरूवातीला करोनाग्रस्त देशातून येणाऱ्या प्रवाशांचीच तपासणी करण्यात येत होती. केंद्र सरकारनं तयार केलेल्या या यादीमध्ये दुबईचं नावच नव्हतं. त्यामुळे दुबईतून येणाऱ्या नागरिकांची तपासणीच करण्यात येत नव्हती. याच काळात अचानक पुण्यातील दोघांना करोनासदृश्य लक्षणं दिसून आली. त्यांचा तपासणी अहवाल आल्यानंतर त्यांना करोना झाल्याचं निष्पन्न झालं.