#CoronaVirus: करोनाचं राजकारण करणाऱ्यांना क्वारंटाईन केलं पाहिजे, संजय राऊत यांचा टोला
करोनाचं राजकारण करणाऱ्यांना क्वारंटाईन केलं पाहिजे असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. राजकारण विसरुन सगळ्यांनी एकत्र यायला हवं अशी आत्ता देशावर आणि राज्यावर वेळ आलेली आहे. मात्र भारतमाता की जय आणि वंदे मातरम म्हटल्यानेच तुमच्यातला प्रखर राष्ट्रवाद जागा आहे असा अर्थ होत नाही. जेव्हा देश एका संकटांशी सामना करतो आहे त्यावेळी प्रत्येकाने एकत्र येऊन या संकटाचा मुकाबला केला पाहिजे या संकटाला तोंड दिलं पाहिजे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात करोनाच्या उपाययोजनेवरुन कोणतंही दुमत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.
करोनाबाबत जनजागृतीची गरज आहे, ती होतानाही दिसते आहे. लोकांनी करोनाविरोधातल्या लढाईत स्वतःला सहभागी करुन घेतलं आहे. लोक मुख्यमंत्री, पंतप्रधान यांचे आदेश पाळत आहेत ही निश्चितच समाधानाची बाब आहे. मात्र एका गायिकेला करोनाची लागण झाली. त्या पार्टीत काही खासदारही गेले होते. आता त्या पार्टीत उपस्थित असलेल्या सगळ्यांकडेच संशयाने पाहिलं जातं आहे. त्यामुळे या अशा गोष्टी टाळायला हव्यात. पुढचे पंधरा दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. प्रत्येकाने काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. फक्त भारतमाता की जय आणि वंदे मातरम! म्हणणं म्हणजे राष्ट्रवाद नाही. अशा कसोटीच्या प्रसंगी सरकारचे आदेश पाळणं हा देखील प्रखर राष्ट्रवाद आहे असं मी मानतो असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.