राज्यात कोरोनाची चिंता कायम; साताऱ्यात २४ तासांत ३७ मृत्यू
मुंबई – राज्यात सध्या कोरोनाचा धोका कमी झाल्याचे वाटत असला तरी चिंता कायम आहे. राज्यात काल गुरुवारी दिवसभरात ५२२५ नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. तर राज्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यू संख्येत वाढ झाली आहे. काल दिवसभरात १५४ रूग्णांचा मृत्यू झाला असून एकट्या साताऱ्यात २४ तासांत ३७ जणांचा कोरोनामूळे मृत्यू झाला आहे.त्यामुळे कोविडचे नियम कटाक्षाने पाळण्यात यावेत, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कुठेही गर्दी करु नका, मास्क वापरा, हात स्वच्छ साबणाने धुवा आणि एकमेकांमधील अंतर राखा, असे आवाहन केले आहे.
राज्यात एकणू ६२ लाख १४ हजार ९२१ कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबई पालिका हद्दीत काल २८२ नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत. मुंबईतील कोरोना बाधितांचा आकडा हा ७ लाख ४० हजार २८९ इतकी आहे. तर २४ तासात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात येत असताना कालचा आकडा चिंता वाढवणार आहे. तर ठाण्यातही २२४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. ठाणे पालिका क्षेत्रात ४९, कल्याण-डोंबिवलीत ६३, नवी मुंबई पालिका हद्दीत ६२, मिरा-भाईंदरमध्ये १८, अंबरनाथमध्ये ८ तर बदलापूरमध्ये ९ आणि ठाणे ग्रामीणमध्ये ९ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.