काँग्रेस नेते राजीव सातव यांची कोरोनावर मात
पुणे – पुण्यात कोरोनाने थैमान घातले आहे. सर्वसामान्यांप्रमाणे लोकप्रतिनिधींनाही कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आणि गुजरातचे प्रभारी राजीव सातव यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र अखेर त्यांनी कोरोनावर मात केली आहे. तब्बल 19 दिवसांच्या उपचारानंतर त्यांची कोरोना चाचणी नेगेटिव्ह आली असून त्यांना रुग्णालयातून लवकरच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.
23 एप्रिलपासून राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वत: पुण्यातील डॉक्टरांशी फोनवरुन चर्चा केली होती. राजीव सातव यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळावेत, यासाठी राहुल गांधी यांनी बरेच प्रयत्न केले होते. त्यानंतर गेल्या आठवड्यापासून राजीव सातव यांच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसत होती. त्यांचे शरीर डॉक्टरांच्या उपचारांना चांगल्याप्रकारे प्रतिसाद द्यायला लागले. तसेच त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळीही सामान्य स्थितीत आली होती.
दरम्यान, राजीव सातव हे काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आहेत. राहुल गांधी यांचे ते विश्वासू सहकारी मानले जातात. मागील वर्षी अहमदबादमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन झाल्यामुळे गुजरातच्या प्रभारीपदी राजीव सातव यांची निवड झाली. राजीव सातव हे हिंगोली मतदारसंघातून खासदार म्हणून 2014 साली निवडून आले होते. राज्यातील अनेक बिकट परिस्थितीत त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. तसेच शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांना पराभूत करून राजीव सातव 2014 मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते. हिंगोलीच्या खासदारपदी असताना त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यांसारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला. संसदेत 1075 प्रश्न विचारत 205 वादविवादांमध्ये ते सहभागी झाले होते. राजीव सातव यांची 81 टक्के उपस्थितीही उल्लेखनीय होती. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 22 एप्रिल रोजी ट्विट करून त्यांनी आपल्याला कोरोना झाल्याची माहिती दिली होती, तसेच आपल्या संपर्कातील सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले होते.