breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

सत्तेत लवकरच येणार: मनसेचे नेते अमित ठाकरे यांचे सूचक विधान!

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी आज ‘आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी’ या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. यावेळी आम्ही सत्तेत लवकरच येणार, असं सूचक वक्तव्य अमित ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना केलं. अर्थात ही सत्ता मुंबई महापालिकेत येणार की राज्यात, हे अनुत्तरित आहे. याआधीही अमित ठाकरेंना शिंदेंच्या कॅबिनेटमध्ये मंत्रिपद मिळणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. तर शिंदे गट-भाजप-मनसे यांची महायुती होणार असल्याची चर्चाही जोरावर आहे.
अमित ठाकरे यांनी दादर चौपाटीवर जाऊन स्वच्छता मोहीम हाती घेतली. ‘चौपाटीवर येऊन पाहायला लागणारं दृश्य उत्साही नाही. मला खूप वाईट वाटतंय’ असं बोलता बोलता अमित ठाकरेंनी हुंदका गिळला. दहा दिवस जल्लोषात बाप्पाची सेवा केल्यानंतर अकराव्या दिवशी दिसणारं दृश्यं पाहवत नाही, अशा भावना अमित ठाकरेंनी व्यक्त केल्या. काल रात्री तीन वाजेपर्यंत शिवतीर्थासमोरुन गणपती विसर्जन मिरवणुका सुरु होत्या, दोन-अडीच वर्षांच्या करोना काळानंतर यावर्षी सर्वच सणांमध्ये उत्साह वेगळाच आहे, असंही अमित म्हणाले

समुद्र किनाऱ्यांच्या साफसफाईबाबत कायम स्वरुपी यंत्रणा उभारणार का, असा प्रश्न विचारताच आम्ही सत्तेत आल्यावरच ते करु, जे लवकरच होईल, कारण त्यासाठी यंत्रणा हातात लागते, असं सूचक वक्तव्य अमित ठाकरेंनी केलं.

महाराष्ट्र दौरा सुरु असून लवकरच विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात आपण जाणार असल्याचं अमित ठाकरेंनी सांगितलं. विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणीसाठी सहकाऱ्यांशी मनमोकळ्या भेटीगाठी घेत आहे. पक्षासाठी सकारात्मक वातावरण आहे, असं अमित म्हणाले. मात्र भाजप नेत्यांशी वाढत्या भेटीगाठी पाहता आगामी काळात राजकीय गणितं बदलणार का, असा प्रश्न विचारताच, यावर राजसाहेब पक्षाची भूमिका सांगतील, असं म्हणत अमित ठाकरेंनी भाष्य करणं टाळलं.

अमित ठाकरे यांनी आज ‘आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी’ या मोहिमेत अनेक पर्यावरणप्रेमींसह दादर समुद्र किनाऱ्यावर वाळूत रुतलेले गणेश मूर्तींचे अवशेष तसंच निर्माल्य उचलून हा किनारा स्वच्छ केला. यावेळी त्यांच्यासोबत मनसे नेते नितीन सरदेसाई, सरचिटणीस संदीप देशपांडे, महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेचे अध्यक्ष जय शृंगारपुरे, पक्षाचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्यासह अनेक पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक तसंच महाविद्यालयीन तरुण तरुणी हेसुद्धा समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले.

आज शनिवार सकाळी मुंबईत गिरगाव, दादर, माहिम, वांद्रे, जुहू, वर्सोवा, अक्सा येथे, रायगड जिल्ह्यात उरण, वर्सोली, नागाव, अलिबाग, मुरुड येथे; तर रत्नागिरीत मांडवी येथे सकाळी ८ ते १० दरम्यान पक्षातर्फे राबवण्यात आलेल्या समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत पक्षाचे पदाधिकारी, असंख्य नागरिक तसंच विद्यार्थी सहभागी झाले. या सर्वांनी गणेश विसर्जनानंतर समुद्राच्या भरती ओहोटीमुळे किनाऱ्यावर आलेले गणेश मूर्तींचे अवशेष तसंच निर्माल्य गोळा करून ते स्थानिक प्रशासनाकडे सोपवले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button