‘राष्ट्रवादी ताब्यात घेतील या भीतीने शरद पवारांनी अजित पवारांवर अन्याय केला’; चंद्रशेखर बावनकुळे
पुढील आठ महिन्यांत उद्धव ठाकरेंकडे चार आमदार राहतील
पुणे : पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सर्वच पक्ष सध्या पुण्यात तळ ठोकून आहेत. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी ताब्यात घेतील या भीतीने शरद पवारांनी अजित पवारांवर अन्याय केला, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भाजपसोबत युती हवी होती. मात्र देवेंद्र फडणवीस हे त्यांना मुख्यमंत्री म्हणून नको होते. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होऊ नयेत, यासाठी षडयंत्र झाले. राज्यात नवीन सरकार येण्यामागे अदृश्य हात आहेत, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
राष्ट्रवादी ताब्यात घेतील या भीतीने शरद पवारांनी अजित पवारांवर अन्याय केला आहे. पुढील आठ महिन्यांत उद्धव ठाकरेंकडे चार आमदार राहतील, असा दावा देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
शरद पवार यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे, असं कधीही वाटू शकत नाही. देवेंद्रजी मुख्यमंत्री नको अशीच भूमिका शरद पवारांची राहिली आहे. देवेंद्रजींचे महाराष्ट्रबद्दलचे व्हिजन आहे. त्यांच्या नेतृत्वात भाजप मोठा पक्ष म्हणून नावारूपाला आला. आधी १२४ नंतर १०५ आमदार देवेंद्रजींच्या नेतृत्वात निवडून आले. मात्र राष्ट्रवादीला ७० आमदार देखील निवडून आणता आले नाहीत, असा टोला बावनकुळेंनी लगावला.