breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

“अमित शाह उपग्रहाच्या माध्यमातून ‘ईव्हीएम’ नियंत्रित करतात”; ठाकरे गटाच्या नेत्याचा खळबळजनक आरोप

मतदान ईव्हीएम यंत्राऐवजी मतपत्रिकेवर घेण्यात यावे

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या रोज एक नवी घटना आणि नवा दावा समोर येत आहे. आता उद्धव ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मोठा दावा केला आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा उपग्रहाद्वारे ईव्हीएम नियंत्रित करतात, असा खळबळजनक दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. ते शिवगर्जना अभियानाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली येथे पत्रकारांशी बोलत होते.

भाजपाला देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपवायचे आहे. यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह स्वतः उपग्रहाच्या माध्यमातून ‘ईव्हीएम’ नियंत्रित करत आहेत. त्यांनी या कामासाठी माणसे ठेवली असून त्यातीलच एकाने मला ही गोपनीय माहिती दिली, असं माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.

यापुढे सर्व निवडणुका मतपत्रिकेवर घेण्यात याव्या. निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्ष वादात नुकतीच जी भूमिका घेतली ती संशयास्पद आहे. त्यामुळे भाजपा सर्वच यंत्रणांचा हवा तसा वापर करत आहे, हे सिद्ध होते. प्रादेशिक पक्षांना संपवण्यासाठी पैशांचा सर्रास वापर सुरू आहे. जे विकले नाही त्यांच्या मागे ईडी, आयकर विभागासारख्या संस्थांना लावले जात आहे. सुडाच्या भावनेतून तुरूंगात डांबले जात आहे. महागाई, रोजगारासारखे मुद्दे बाजुला करून देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे कामदेखील सुरू आहे. हा सर्व प्रकार जनतेच्या लक्षात आला असून, निष्पक्ष निवडणुका झाल्यास भाजपला घरी जावे लागेल. त्यासाठी मतदान ईव्हीएम यंत्राऐवजी मतपत्रिकेवर घेण्यात यावे, अशी मागणी खैरे यांनी केली.

दरम्यान, एकनाथ शिंदे बंडखोरी करणार आहेत. याबद्दल पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना माहिती होती. म्हणूनच बंडखोरीच्या महिन्याभरापूर्वी उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना बोलावून घेतले व तुला मुख्यमंत्री व्हायचे आहे काय, अशी विचारणा केली होती, असंही चंद्रकांत खैरे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button