‘सैनिकांचे मनोधैर्य वाढवणारे उपक्रम राबवणे ही सुद्धा देशसेवाच!’; सुप्रिया सुळे
पुणे : आधार सोशल ट्रस्ट धायरी च्या वतीने मायेचा एक घास जवानांसाठी या उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय ग्रिटींग कार्ड स्पर्धेचे आयोजन केले होते त्या स्पर्धेचे बक्षीस वितरण महाराष्ट्राच्या संघर्ष कन्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते पार पडला. तेव्हा त्यांनी हे गौरवोद्गार काढले.
आधार सोशल ट्रस्ट मार्फत राबवले जाणारे – मायेचा एक घास जवानांसाठी,वाचाल तर वाचाल स्पर्धा, राष्ट्रीय खो खो टूर्नामेंट, स्थानिक पातळीवर राबविलेले महिला सक्षमीकरण उपक्रम, आरोग्य शिबीरे असे एक ना अनेक उपक्रम सामाजिक भान जपणारे आहेत. देशपातळीवर राजकीय आणि सामाजिक वातावरण कलुषित होत असताना आधारचे काम हे इतर संस्था संघटनांना दिशादर्शक असेच आहे असे सूप्रियाताई म्हणाल्या.
“मायेचा एक घास जवानांसाठी” दिवाळी फराळ सीमेवर घेऊन जात असताना आधारची टीम विविध राज्यातून प्रवास करत असते त्यावेळी राष्ट्रीय एकात्मता व अखंडता बंधुभाव जोपासण्यासाठी “भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत” असा संदेश पोहोचविण्याचे कार्य आधार टीम सातत्याने करत आहे.
हेही वाचा – ‘मी सदानंद सुळेंना मतं मागायला फिरवत नाही’; सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला
राज्यस्तरीय ग्रिटींग कार्ड स्पर्धेबाबत माहिती देताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष चाकणकर यांनी सांगितले की सैनिकांचे मनोबल वाढवणे व आम्ही तुमच्या सोबत आहोत ही भावना सैनिकांत निर्माण करण्यासाठी आधार सोशल ट्रस्ट गेल्या आठ वर्षांपासून दिवाळी सण चीन पाकिस्तान सीमेवरील भारतीय सैनिकांसोबत साजरा करत आहे.फराळासोबत मनोधैर्य वाढवणारे दिवाळी भेटकार्ड सुद्धा सैनिकांना प्रत्यक्ष दिले जाते तेव्हा त्यातील मजकुराने त्यांच्या भावना अनावर होताना आम्ही पाहतो.
हे सैनिक शाळांतील त्या चिमु चिमुकल्यांना जेव्हा फोन करतात तेव्हा त्या कुटुंबाला व शाळेला सुद्धा अभिमानास्पद कामगिरी केल्याची भावना तयार होते.
सदरील स्पर्धेत राज्यातील ११० शाळांनी मिळून १०,०००(दहा हजार) ग्रिटींग कार्ड सैनिकांसाठी अत्यंत आत्मियतेने पाठवले. हे ग्रीटिंग कार्ड वैयक्तिकरित्याही पोष्ट/कुरिअरने व प्रत्यक्ष अशा अनेक स्वरूपात ग्रिटींग कार्ड प्राप्त झाले. हे ग्रीटिंग कार्ड यावर्षी पठाणकोट, गुरुदासपूर, अमृतसर,अटारी बॉर्डर करतारपूर, कॉरिडोर बिकानेर ,जैसलमेर , नथुला पास,सिक्कीम, धर्मशाला,सुंदरबनी, बटोट डेल्टा ग्रुप, डी आय जी बीएसएफ साऊथ जैसलमेर आणि इतर अभियंता दल या ठिकाणी ग्रीटिंग कार्ड पाठवण्यात आले होते.
पुणे,रायगड,सातारा,सांगली, अहमदनगर,जळगाव, उस्मानाबाद , सोलापूर, मुंबई,नासिक, रत्नागिरी, औरंगाबाद,ठाणे व कोल्हापूर अशा १४ जिल्ह्यांचा उत्तम सहभाग होता.दि २५ रोजी यातील निवडक ७० शाळांतील मुख्याध्यापक/प्राचार्य यांचा तसेच राज्यस्तरीय स्पर्धेत चार गटांतून विजेते ठरलेले १०५ विद्यार्थी व नागरिकांचा यथोचित सन्मान करण्यात करण्यात आला.
याप्रसंगी महाराष्ट्रभरातून शाळेतील मुख्याध्यापक विद्यार्थी यांचा भरघोस प्रतिसाद पाहून महाराष्ट्राचे संघर्ष कन्या खासदार सुप्रियाताई यांनी देखील देशप्रेम जागृत करणारे कार्यक्रम पिढ्यांना पिढ्या चालवत रहावे, असे आश्वासन दिले.