पंतप्रधान नरेंद्र मोदींचे या ‘रविवारी’ बँक सुरू ठेवण्याचे आदेश; मोठी घडामोड होणार…

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निर्णय घेण्याची शैली ही भारतीय राजकारणात वेगळी आणि ठळकपणे उठून दिसणारी आहे. पारंपरिक राजकीय प्रक्रियांपेक्षा वेगळ्या मार्गाने आणि वेगाने निर्णय घेण्याची त्यांची पद्धत अनेकदा ‘आश्चर्यकारक’ आणि ‘धक्कादायक’ ठरलेली आहे. नोटाबंदीचा निर्णय याचे उत्तम उदाहरण मानले जाते. हा निर्णय इतका अचानक होता की देशभरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर जम्मू-काश्मीरमधील विशेष दर्जा रद्द करणे, तीन कृषी कायदे आणणे आणि त्यानंतर शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते कायदे मागे घेणे, हे सर्व निर्णय देखील अशाच अचानक घेण्यात आले. तसेच कोविड-१९ च्या काळात संपूर्ण देशभरात केवळ चार तासांच्या नोटीसवर लॉकडाऊन लावण्याचा निर्णयही त्यांनी घेतला, जो जागतिक पातळीवर चर्चेचा विषय ठरला.
त्यांच्या निर्णयशैलीवर अनेक स्तरांवर चर्चा होते. असाच एक महत्वपूर्ण निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता घेतला आहे. सामान्यत: आर्थिक वर्षाची समाप्ती होत असताना मार्चच्या अंतिम आठवड्यात बँक सुरू ठेवले जाते. मात्र आता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी म्हणजे ३ ऑगस्ट सर्व बँकेच्या सर्व शाखा सुरू ठेवण्याबाबत मोदींनी आदेश दिले आहे. या आदेशानुसार, रविवारी सर्व बँक शाखेतील कर्मचारी कार्यरत राहतील.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना २०वा हप्ता वितरित करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून, यासाठी बँकेच्या सर्व शाखा ३ ऑगस्ट २०२५ (रविवार) रोजी देखील खुले ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या सूचनेनुसार २९ जुलैपासून ते ३ ऑगस्टपर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे. विशेष म्हणजे, २ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पात्र शेतकऱ्यांना २०वा हप्ता वितरित केला जाईल. त्यानंतर लगेचच ३ ऑगस्ट रोजी बँक शाखा सुरू ठेवून लाभार्थ्यांना रकमेचा थेट लाभ पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने सर्व बँकांना २९ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान शाखा कार्यरत ठेवण्यास सांगितले असून, ३ ऑगस्ट (रविवार) रोजी देखील एनईएफटी/आरटीजीएस प्रणाली कार्यरत ठेवण्याची खातरजमा करण्यात आली आहे. यामुळे निधीचा त्वरित आणि अडथळारहित ट्रान्स्फर शक्य होणार आहे. शाखांमध्ये पुरेशा कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहावी, तसेच पुरेसा निधीही उपलब्ध असावा याची दक्षता घेण्याचे निर्देश बँकेने आपल्या सर्व प्रादेशिक व नियंत्रण कार्यालयांना दिले आहेत. लाभार्थ्यांपर्यंत निधी वेळेत पोहोचवण्यासाठी ही यंत्रणा सुचारू ठेवणे आवश्यक असल्याचेही बँकेने स्पष्ट केले आहे.





