‘माळीण’ची पुनरावृत्ती! रायगडच्या इर्शाळवाडीत दरड कोसळली, अनेक जण बेपत्ता
Raigad Landslide : रायगडच्या इर्शाळवाडीत दरड कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत सुमारे ६० ते ७० कुटुंब दबल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या त्या ठिकाणी NDRF ची दोन पथके बचावकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाली आहेत. या बचाव पथकाचं शोधकार्य सुरू आहे. आत्तापर्यंत २५ हून अधिक जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. तर या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री आणि रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घटनेची पाहणी केली आहे. सध्या पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे १०० हून अधिकारी-कर्मचारी बचाव कार्यात गुंतले असल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा – भाजपाचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी थोपटले दंड..!, “अबकी बार १२५ पार”
इर्शाळवाडी हे एक छोटंसं गाव असून त्या गावात ५० ते ६० घरांची वस्ती आहे. पावसामुळे इर्शाळगड खडकाचा काही भाग कोसळला असून त्यात अनेक गावकरी माती-खडकांच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना काल रात्री ११.३० ते १२ च्या सुमारास घडल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
Maharashtra | An incident of landslide reported at Irshalwadi village in Khalapur tehsil in Raigad District, two teams of NDRF have been moved: NDRF
— ANI (@ANI) July 19, 2023
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल
दरड कोसळल्याने लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. आतापर्यंत चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मदतकार्य सुरू आहे. एनडीआरएफ, टीडीआरएफ व स्थानिक मदत पथक काम करत आहे. मदतकार्यासाठी दोन हेलिकॉप्टर तयार आहेत. मात्र, वातावरण खराब असल्याने हेलिकॉप्टर उड्डान करू शकत नाही. मी स्वतः हवाईदलाशी बोलत आहे. मी सातत्याने त्यांच्या संपर्कात आहे. ज्या माध्यमांचा वापर करता येईल त्या त्या माध्यमांचा वापर करून मदत केली जाईल. जनावरंही मोठ्या प्रमाणात अडकले आहेत. काही वेळापूर्वीच एनडीआरएफच्या जवानांनी एका जनावराला जीवंत बाहेर काढलं. एका मुलीलाही जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आलं. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.