पाकिस्तानने फेटाळला बालाकोट दहशतवादी तळ सुरु झाल्याचा आरोप
बालाकोटमधील दहशतवादी तळ सक्रिय झाल्याचा आरोप पाकिस्तानने फेटाळून लावला आहे. लष्करप्रमुख बिपीन रावत यांचे विधान आधारहीन असून चुकीचे असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. बिपीन रावत यांनी सोमवारी चेन्नईमध्ये पत्रकारांशी बोलताना बालकोटमध्ये दहशतवादी तळ सुरु झाला असून ५०० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत असल्याचे म्हटले होते.
फेब्रुवारी महिन्यात इंडियन एअर फोर्सच्या फायटर विमानांनी हवाई हल्ल्यात हा दहशतवादी तळ उद्धवस्त केला होता. जम्मू-काश्मीरमधल्या घडामोडींपासून आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वळवण्याच्या हेतूने दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत असल्याच्या बातम्या दिल्या जात आहेत असा आरोप पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.
भारताकडून केली जाणारी विधाने आणि उपायोजना प्रदेशाची स्थिरता आणि शांततेसाठी धोकादायक आहेत. अशी नकारात्मक रणनिती वापरुन भारत आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करण्यात यशस्वी होणार नाही असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैझल यांनी म्हटले आहे.