‘आता मी शिस्त पाळणार’, साध्वी प्रज्ञा यांना मोदींना भेटण्याची इच्छा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/sadhvi-pragya-singh-thakur.jpg)
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वारंवार वादग्रस्त विधाने करुन पक्षाला अडचणीत आणणाऱ्या भाजपाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी यापुढे पक्षशिस्त पाळणार असल्याचे म्हटले आहे. पक्षशिस्तीला अनुसरुनच आपला कारभार असेल असे साध्वी प्रज्ञा यांनी सांगितले. राष्ट्रपिता महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला देशभक्त ठरवल्यानंतर साध्वी प्रज्ञा यांना भाजपा नेतृत्वाने कारणेदाखवा नोटीस बजावली होती.
भोपाळ लोकसभा मतदारसंघातून साध्वी प्रज्ञा यांनी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर मोठया मताधिक्याने विजय मिळवला. मी पक्षाची शिस्तबद्ध सदस्य असून पक्ष संघटनेत शिस्त असली पाहिजे असे मत साध्वी प्रज्ञा यांनी व्यक्त केले. संधी मिळेल तेव्हा मला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला आवडेल असे साध्वी प्रज्ञा म्हणाल्या.
नथुराम गोडसेची स्तुती केल्याबद्दल पंतप्रधान मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी साध्वी प्रज्ञा यांची कानउघडणी केली होती. गोडसेंबद्दल साध्वी प्रज्ञा ज्या म्हणाल्या त्याबद्दल मी त्यांना कधीही माफ करणार नाही असे पंतप्रधान मोदी जाहीर सभेत म्हणाले होते.
भोपाळमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर साध्वी प्रज्ञा यांनी सर्वातआधी दिवंगत एटीएसप्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे यांचा आपल्या शापामुळेच मृत्यू झाला असा दावा साध्वी प्रज्ञा यांनी केला होता. त्यांच्या विधानावर चौफेर टीका झाल्यानंतर साध्वी प्रज्ञा यांनी माफी मागितली.