Manoj Jarange Patil | मनोज जरांगे मुंबईत दाखल होण्याआधीच हायकोर्टाची नोटीस
मुंबई | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. आज ते पुण्यात आहेत. उद्यापर्यंत ते मुंबईच्या वेशीवर पोहोचू शकतात. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली आहे. यावेळी न्यायालयाकडून मनोज जरांगेंना नोटीस बजावली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या मोर्चाला प्रतिबंध घालण्यात यावा, सरकारने या मोर्चावर कडक कारवाई करावी, अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केलीये. न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी पार पडली. यानंतर जरांगेंना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
हेही वाचा – भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतून विराट कोहलीची माघार, ‘या’ खेळाडूला मिळाली संधी!
यावेळी न्यायाधीशांनी गुणरत्न सदावर्ते आणि महाधिवक्ता रविंद्र सराफ यांचा युक्तिवाद ऐकून घेत असताना महत्त्वाचे निर्देश दिले. सरकारने रोड ब्लॉक होणार नाही याची खबरदारी घ्यावी. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बिघडणार नाही याची जबाबदारी घ्यावी, असे निर्देश हायकोर्टाने सरकारला दिले. मनोज जरांगेंना उच्च न्यायालयात हजर होण्याबाबत नोटीस बजावा. आझाद मैदान पोलिसांनी जरांगे यांना नोटीस बजावावी. आझाद मैदानात ५ हजार पेक्षा जास्त लोक येवू शकत नाही हे देखाल कळवण्यात यावं, असंही कोर्टाने म्हटलंय.