चोरीचे डिझेल पकडलेल्या बोटीं आगीत जळून खाक..!
मुंबई |
नवी मुंबईत चोरीचे डिझेल पकडलेल्या बोटींना बुधवारी सकाळी अचानक आग लागली आणि या आगीत बोटी जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलाने आग विझवण्याचे कसोशीचे प्रयत्न केले मात्र बोटींना चारही बाजूंनी सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या टायरमुळे आग विझवली तरी पुन्हा वारंवार लागत होती. अवैधरित्या डिझेल चोरून विक्री करण्याऱ्या टोळीला अटक करण्यात आली होती तर जप्त करण्यात आलेल्या दोन बोटी या एनआरआय पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या उरण उड्डाणपुलाखाली खाडीत लावण्यात आलेल्या होत्या. या दोन्ही बोटींना बुधवारी सकाळी ७ च्या सुमारास अचानक आग लागली. नेमके कोणत्या बोटीला अगोदर आग लागली हे समोर आले नाही. या बोटीतील २१ हजार ४७० लिटर डिझेल अगोदरच काढून ठेवल्याने मोठा अनर्थ टळला.
या बोटीतील डिझेल जरी काढण्यात आलेले होती तरी त्यातील बॅटरीमध्ये स्पार्क होऊन कदाचित आग लागली असू शकेल असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला तरीही आग लावण्यात आली वा नेमके कशाने आग लागली याची चौकशी सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांनी दिली. १० जानेवारीला नवी मुंबई पोलिसांनी अवैधरीत्या चोरीचे डिझेल विकणाऱ्या टोळीस अटक करून त्यांच्याकडील ३५ लाख २ हजार ७५० रुपयांचे २१ हजार ४७० लिटर डिझेल जप्त केले होते. ही कारवाई नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा आणि राज्यस्तरीय दक्षता मुंबई आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्तरित्या केली होती यात सलीम अब्दुल शेख, असिफ वालियानी, प्रवीण नाईक विठ्ठल देवकाते आणि दत्ता देवकाते यांना अटक करण्यात आले होती. या आरोपींनी ज्या बोटीतून डिझेल चोरी आणि नंतर स्वस्तात विक्री केली जात होती त्या दोन बोटीही जप्त करण्यात आल्या होत्या.ज्या बुधवारी आगीच्या भक्षस्थानी पडल्या..