भाजपाला मोठा रसगुल्लाच मिळणार आहे! ममता बॅनर्जींचा टोला
मुंबई – केंद्रासह अनेक राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपाने आता पश्चिम बंगाल काबिज करण्यासाठी सर्वस्व पणाला लावलं आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपा दोनशेपेक्षा जास्त जागा जिंकणार, असा विश्वास भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. या दाव्यावरून आता ममतांनी शहांना टोला लगावला आहे. चंदीपूर येथील प्रचार सभेत बोलताना ममता बॅनर्जी यांनी भाजपा आणि अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. ‘भाजपा सर्व जागा जिंकणार असल्याचा दावा का करत नाही. बाकीच्या जागा त्यांनी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टीसाठी सोडल्या आहेत का? पण भाजपाला मोठा रसगुल्लाच मिळणार आहे’, असा टोला ममतांनी लगावला आहे.
वाचा :-देशात कोरोनाचा उद्रेक! 24 तासांत तब्बल 68,020 नव्या रुग्णांची नोंद
दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर अमित शहा यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी ‘बंगालमध्ये भाजपा दोनशेपेक्षा अधिक जागा जिंकेल’, असा दावा केला होता. शहा यांच्या या दाव्यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी शहा यांना टोला लगावला आहे.