Bird Flu | मुंबई, ठाणे, रत्नागिरी, बीडमध्येही बर्ड फ्लू झाल्याचं निष्पन्न
देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. यातच आता देशातील इतर राज्यांसह महाराष्ट्रातही बर्ड फ्लून शिरकाव केला आहे. रविवारी परभणीच्या मुरुंबा गावातील 800 पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूनेच झाला असल्याचं स्पष्ट झालं होतं. अशातच आता परभणीपाठोपाठ मुंबई, ठाणे, बीड, तसेच रत्नागिरीतील दापोलीतही बर्ड फ्लू पोहोचल्याचं निष्पन्न झालं आहे. एएनआय वृत्तसंस्थेने यासंदर्भात माहिती दिली.
एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, ‘महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं निष्पन्न झालं आहे. महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, परभणी, बीड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीतही बर्ड फ्लूचं असल्याचं निष्पन्न झालं आहे.’
दोन दिवसांपूर्वी मुरुंबा गावातील 800 कोंबड्यांचा अज्ञात रोगाने मृत्यू झाला होता. जिल्हा प्रशासन, पशुसंवर्धन विभागाने तत्काळ पक्षांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले होते. तिथून हे नमुने भोपाळ येथील प्रयोग शाळेत पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल रविवारी रात्री उशिरा जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला. त्यात बर्ड फ्लू मुळेच कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
गावात एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले असून गावातील दहा किलोमीटर परिसरात कुकूट पक्ष्यांची खरेदी, विक्री, वाहतूक, बाजार आणि जत्रा, प्रदर्शन तसेच पशुपक्ष्यांच्या अवागमनास बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे.