स्वतंत्र निवडणुका लढण्यासाठी सज्ज रहा ! ; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना अजित पवार यांचा सल्ला
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपल्या विचारांचे जास्तीत जास्त प्रतिनिधी निवडून आले पाहिजेत. पक्षाकडून निर्णय होईल याची वाट बघत बसू नका. आघाडीचा निर्णय होईल तेव्हा होईल. तोपर्यंत स्वतंत्र लढायचे आहे या दृष्टीने निवडणुकीच्या तयारीला लागा, असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्षाच्या शिर्डीतील शिबिरात बोलताना शुक्रवारी दिला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडून आलेले कार्यकर्तेच पक्षाला ताकद देतात त्यातून आमदार, खासदार होतात. हेच लोक लोकसभा, विधानसभा निवडणुकीची वाट सोपी करणारे आहेत. तेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच निवडणुकीच्या दृष्टीने सज्ज राहण्याचे आवाहनही पवार यांनी केले.
लोकशाही व्यवस्थेला नख लावण्याचे काम केले जात आहे. परंतु ते कधीही यशस्वी होणार नाही. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका वेळेत होणे आवश्यक आहे, परंतु निवडणुकांना विलंब लावला जात आहे. हे लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही. निवडणुका वेळेत होणे याकडे राज्य निवडणूक आयोगाने लक्ष दिले पाहिजे, त्यांची ती जबाबदारी आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. पुढील वर्षांच्या सुरुवातीला विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी निवडणूक होईल. या पाचही जागा निवडून येतील या दृष्टीने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रयत्न करणे आश्यक आहे, असेही मत पवार यांनी व्यक्त केले.