डोंबिवलीत शिवसेना आणि भाजपामध्ये बॅनर वॉर; भाजपा म्हणालं ‘विकासाचे मारेकरी’, शिवसेना म्हणते ‘गाजर दाखवलं’
मुंबई |
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची मुदत ऑक्टोबर २०२० मध्ये संपली आहे. तेव्हापासून प्रशासक म्हणून पालिका आयुक्तांमार्फत पालिकेचा कारभार सुरु आहे. दरम्यान लवकरच महानगरपालिकेच्या निवडणुकांबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. यामुळे कल्याण डोंबिवलीत सध्या महानगर पालिका निवडणुकांचे वारे वाहत आहेत. यामुळेच या भागातील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांचे सत्र सध्या जोरात सुरु आहे. डोंबिवलीत नुकतेच भाजपाकडून एकनाथ शिंदे विकासाचे मारेकरी असल्याचे बॅनर लावण्यात आले होते. यानंतर आता शिवसेनेनेही बॅनरच्या माध्यमातून आमदार रवींद्र चव्हाण यांना उत्तर दिलं असून उलट सवाल केला आहे.
डोंबिवलीमध्ये भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांनी शिवसेनेवर टीका केल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी शुक्रवारी डोंबिवली शहराच्या विविध भागात आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर विकास कामांच्या माध्यमातून टीका करणारे फलक लावले आहेत. या फलकावर पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या विकासकामांची यादीच मांडण्यात आली आहे. तर १३ वर्ष डोंबिवलीत आमदार म्हणून राहिल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी किती विकासकामांच्या घोषणा केल्या. त्यामधील किती मार्गी लागली असा लेखाजोखा फलकावर समोरासमोर लावला आहे. हे फलक डोंबिवलीमध्ये चर्चेचा विषय झाले आहेत. कल्याण डोंबिवली पालिकेच्या आगामी निवडणूक जशा जवळ येऊ लागल्या आहेत तसे भाजपा आणि शिवसेनेमध्ये विकासकामांचे श्रेय घेण्यावरून जोरदार कलगीतुरा रंगण्यास सुरुवात झाली आहे.