सत्यजीत तांबे प्रकरणावर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया; म्हणाले,..मोठं राजकारण झालं
मी याबाबत माझी भूमिका पक्षक्षेष्टींकडे मांडली आहे
नाशिक : आपणास काँग्रेसमधून बाहेर काढण्याचं तसेच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्याचं षडयंत्र रचलं गेलं, असा आरोप नाशिक पदवीधर मतदारसंघातील विजयी उमेदवार सत्यजीत तांबे यांनी केला. या पार्श्वभूमीवर आता बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते संगमनेरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.
विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी मोठं राजकारण झालं. सत्यजीत तांबे या निवडणूकीत चांगल्या मतानी विजयी झाले. मी त्यांचं अभिनंदन करतो. मात्र, जे राजकारण झालं, ते व्यस्थित करणारं होतं. मी याबाबत माझी भूमिका पक्षक्षेष्टींकडे मांडली आहे. हे पक्षीय राजकारण आहे. त्यामुळे यावर बाहेर बोललं पाहिजे, या मताचा मी नाही. याबाबत पक्षातील नेत्यांबाबत बोलणं झालं असून योग्य तो निर्णय होईल, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
गेल्या काही दिवसांत काही लोकांना आपल्याबद्दल गैरसमज पसवण्याचं काम केलं. मात्र, काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे आणि आपली पुढची वाटचालही याच विचाराने होणार आहे, असंही थोरात म्हणाले.
महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर मोठ्या प्रमाणात राजकारण होतं आहे. अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे. त्यांना अडचणी आणलं जात आहे, त्यांचे उद्योग बंद पाडण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न सुरू आहे. मात्र, आपण अनेकदा संघर्ष केला आहे. संघर्षातूनच आपण मोठं झालो आहे. त्यामुळे या संघर्षातून आपण नक्कीच बाहेर येऊ, असा मला विश्वास आहे, असंही म्हणाले.