बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांचं विधान भवनात काँग्रेस नेत्यांकडून स्वागत, बविआची ३ मतं काँग्रेसला मिळणार?
मुंबई : ज्यांच्या ३ मतांवर विधान परिषदेचा निकाल फिरणार आहे, त्या बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांचं काँग्रेस नेत्यांनी स्वागत केलं आहे. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हितेंद्र ठाकुरांसह बविआच्या तीन आमदारांचं विधिमंडळ परिसरात आगमन झालं. त्यांचं आगमन होताच काँग्रेस नेत्यांनी ठाकुरांचं स्वागत केलं. अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे मागील दहा दिवसांपूर्वी पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीवेळी भाजप नेत्यांनी ठाकूर यांच्यासह बविआ आमदारांचं स्वागत केलं होतं. त्यानंतर आता काँग्रेस नेत्यांनी हितेंद्र ठाकूर यांचं स्वागत केल्याने बविआ काँग्रेसला मतदान करणार का?, अशी चर्चा विधिमंडळ परिसरात सुरु होती.
राज्यसभेच्या चुरशीच्या लढाईनंतर आज विधान परिषदेच्या १० जागांसाठी भाजप-महाविकास आघाडीत पुन्हा संघर्ष होतो आहे. सकाळी १० वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. दुपारी २ वाजेपर्यंत जवळपास २७५ पेक्षा अधिक आमदारांनी मतदान केलं आहे. ठराविक आमदारांचं मतदान राहिलं आहे. अशातच दुपारी अडीच वाजता किंगमेकर हितेंद्र ठाकूर यांची विधिमंडळ परिसरात आगमन झालं.
लागलीच ठाकूर यांच्या स्वागताला काँग्रेस नेते धावत आले. यावेळी हितेंद्र ठाकूर यांच्याबरोबर बहुजन विकास आघाडीचे आमदार सिद्धेश ठाकूर आणि आमदार राजेश पाटील होते. तिन्ही आमदारांचं काँग्रेस नेत्यांनी स्वागत केलं. तिन्ही आमदारांना घेऊन काँग्रेस नेते मतदानासाठी गेले. दोनच दिवसांपूर्वी काँग्रेस उमेदवार भाई जगताप यांनी विरारमध्ये जाऊन ठाकूर यांची भेट घेतली होती. दरम्यान, राज्यसभेवेळी हितेंद्र ठाकूर यांनी शेवटपर्यंत आपण मतदान कुणाला करणार, हे गुलदस्त्यात ठेवलं. मतदान पार पडल्यानंतर मात्र विकासाला मतदान केल्याचं ठाकूर यांनी सांगितलं. त्यानंतर आश्चर्यकारकरित्या भाजपच्या धनंजय महाडिक यांचा विजय झाला. ठाकूर यांची मतं भाजपच्या बाजूने वळविण्यात फडणवीसांना यश आल्याचं बोललं गेलं. आज काँग्रेस नेत्यांनी ठाकूर यांचं स्वागत केल्याने बविआची मतं काँग्रेसला जाणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात होत्या.