मराठा आरक्षणावरून आमदार बच्चू कडूंचा राज्य सरकारला इशारा; म्हणाले..
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे. मात्र, राज्य सरकार आरक्षण देण्यास अनुकूल दिसत नाही. दरम्यान, यावरून प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
आमदार बच्चू कडू म्हणाले, ओबीसींना भेटलेले आरक्षण कमीच आहे. देशात ओबीसींचा वाटा जास्त आहे. पण, २७ टक्क्यांवर आरक्षण नाही. तर, ओबीसी आरक्षण वाढवून घ्या किंवा अ,ब,क,ड असे वर्ग करा. पण, मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण थेट नाही म्हणणं, हा खूप चुकीचा संदेश आहे.
हेही वाचा – मराठा आरक्षण : पिंपरी-चिंचवड शहरातील मराठा बांधवांचा तहसिल कार्यालयावर मोर्चा
मराठा ओबीसी नाही का? मग ते कोण आहेत? पाकिस्तान की अमेरिकेतील आहे? मराठ्यांचा आरक्षणावर अधिकार का नाही? मराठ्यांचं मागासलेपण सरकारला माहिती नाही. मग, मराठ्यांना आरक्षण का नाकारता? असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्रात वाढत चाललेला भेदभाव चुकीचा आहे. सगळीकडे मराठा कुणबी आहे. फक्त मराठवाड्यातील मराठा लिहिल्यानं चालत नाही. संत तुकाराम महाराजांनी स्वत: सांगितलं की, ‘बरे झाले देवा कुणबी झालो’. ते मोरे ‘मराठा’ लिहितात. इतकं स्पष्ट असताना आरक्षण नाकारणं म्हणजे जाणीवपूर्वक पळवाट काढल्यासारखं आहे. ज्यांनी मोगलांच्या तलवारी छातीवर घेतल्या. त्यांच्याच छातीवर सरकार तलवारी चालवत असेल, तर तुमची तुलना मोगलांबरोबर करण्याची वेळ येऊ नये, असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे.