‘आता छातीवर तलवार ठेवली तरी मी मंत्रिपद स्विकारणार नाही’; बच्चू कडूंचं विधान
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डिनरचे आयोजन केलं आहे. मात्र याला प्रहारचे आमदार बच्चू कडू यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. दरम्यान, यावरून आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच मंत्रिमंडळ विस्तार आणि प्रहारची भूमीकाही बच्चू कडू यांनी स्पष्ट केली आहे.
आमदार बच्चू कडू म्हणाले, एकनाथ शिंदेंच्या डिनरचं मला निमंत्रण मिळालेलं नाही. कदाचित कॅबिनेट मंत्र्यांसाठीच हे आयोजन असेल. म्हणून मला निमंत्रण पाठवलं नसेल. मला मंत्रीपदाचा दर्जा आहे. पण मंत्र्याचा दर्जा असणं आणि कॅबिनेट मंत्री असणं यात जमीन-आस्मानाचा फरक आहे.
हेही वाचा – ‘शरद पवारांचा फोटो वापरणं हे अजित पवार गटाचं ढोंग’; संजय राऊतांचा टीका
मला एकनाथ शिंदेंचा फोन आला होता. पण त्यात मंत्रीमंडळ विस्तारावर कोणतीही चर्चा झालेली नाही. आता छातीवर तलवार ठेवली तरी मी मंत्रीपद स्वीकारणार नाही. तशी परिस्थिती आल्यास राजकुमार पटेल यांना आम्ही मंत्री करू, असं सूचक विधान आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे.
पवार काका-पुतण्यावरून संभ्रम व्हायचं कारण नाही. प्रत्येक नेता पक्ष आपला पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. सत्ता आणि सत्तेतला पक्ष असं समिकरण सध्या झालंय. शरद पवार यांच्या स्वभावाची मोजणी करणं शक्य नाही. समुद्राचा तळ मोजला जाईल, पण शरद पवार यांच्या मनात काय चाललं हे ओळखणं शक्य नाही. भाजपने पावलं टाकली असतील. राष्ट्रवादीचाच गेम करायचा आणि शरद पवार साहेब भाजपचाच गेम करतील की काय, अशा संभ्रमात सध्या अवस्था आहे. अजितदादा मुख्यमंत्री होणार नाहीत. समजा शिंदे साहेबांना डावलून अजितदादांना मुख्यमंत्री केलं तर भाजपला खूप परिणाम भोगावे लागतील, असंही बच्चू कडू म्हणाले.